वाशिम : जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन लांबल्याचा थेट फटका जलसाठ्यांना बसला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १६६ मिमी पावसाची नोंद झाली असून, जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांमध्ये सरासरी अवघा १०.३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. यातही वाशिम शहराची तहान भागवणाऱ्या 'एकबुर्जी' प्रकल्पाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक असून, तिथे केवळ ८.५२ टक्के पाणीसाठा उरला आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी पाणी
जुलै महिना अर्ध्यावर आला असतानाही एकबुर्जी प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, मागील वर्षी याच कालावधीत या प्रकल्पात सुमारे ३१ टक्के पाणीसाठा होता. त्या तुलनेत यंदाची स्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे.
दमदार पावसाची प्रतीक्षा
जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी आता दमदार पावसाची नितांत गरज आहे. पावसाचा हा खंड कायम राहिल्यास, आगामी काळात शहरात पिण्याच्या पाण्याचे भीषण संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिक आता पावसाच्या पुढील सरींकडे डोळे लावून बसले आहेत.