Washim Potholes Issues
वाशीम : वाशीम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौक या महत्त्वाच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा हा रस्ता सध्या ठिकठिकाणी मोठ्या खड्ड्यांनी भरलेला आहे. वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत समाजसेवक सागर कोकास यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन सादर करून तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे. या मार्गावर दररोज हजारो नागरिक, व्यापारी, विद्यार्थी तसेच रुग्णवाहिका व शासकीय वाहने ये-जा करतात. मात्र, रस्त्याची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे.
विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौक हा मार्ग शहरातील व्यापारी आणि दैनंदिन वाहतुकीचा मुख्य कणा मानला जातो. तरीही अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरुस्ती न झाल्याने प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांच्या मते, निवडणुका जवळ आल्या की आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था अधिकच बिकट होत चालली आहे.
समाजसेवक सागर कोकास यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तात्काळ रस्ता दुरुस्तीचे काम सुरू झाले नाही तर नागरिकांच्या सहकार्याने तीव्र आंदोलन छेडले जाईल. शहरातील प्रमुख रस्ता असूनही नगर परिषद प्रशासनाकडून होत असलेली दुर्लक्षाची भूमिका संतापजनक असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या मागणीमुळे आता नगर परिषद प्रशासन आणि लोकप्रतिनिधी रस्ता दुरुस्तीबाबत काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण वाशीमकरांचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीनंतर नुकतीच नगराध्यक्ष पदाची सूत्रे आपण स्वीकारली असून सध्या नगरपरिषदेकडे कोणत्याही विकासकामासाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. रस्त्यांच्या कामांसाठी निधी उपलब्ध करून घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहेत. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटणी चौक हा महत्त्वाचा मार्ग असून नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन हा रस्ता प्राधान्याने दुरुस्त करण्यात येईल- अनिल केंदळे (नगराध्यक्ष)