

वाशीम| अजय ढवळे
वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे येथील शेतकरी राजू कालापाड यांनी स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना दि. २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली.
राजू कालापाड यांच्या मुलीचे लग्न १४ मार्च रोजी होणार होते. आज लग्नाच्या बस्त्याची खरेदी करण्याचा दिवस होता; मात्र पैशांची जुळवाजुळव न झाल्याने निर्माण झालेल्या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे गावकऱ्यांनी सांगितले आहे.
राजू कालापाड यांच्याकडे अवघी एक एकर शेती होती. गेल्या काही वर्षांत शेतीतून अपेक्षित उत्पन्न न मिळाल्यामुळे कर्जाचा डोंगर त्यांच्या डोक्यावर वाढला होता.
त्यामुळे राजू हे पत्नीसह पुण्यात मोलमजुरीसाठी गेले होते. मात्र मुलीच्या लग्नासाठी काही दिवसांपासून ते गावी आले होते.
आज सकाळी शेतात जाऊन त्यांनी झाडाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. राजू यांना एक मुलगी आणि दोन लहान मुले आहेत. अवघ्या एका महिन्यावर मुलीचे लग्न आले असताना त्यांनी आत्महत्या केल्याने गावकऱ्यांकडून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.