वाशिम: पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र ग्राम रोजगार हमी योजनेअंतर्गत कारंजा तालुक्यातील तांत्रिक अधिकारी रणजित गजानन मोरे यांना कंत्राटी सेवेतून तात्काळ कमी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी काढले आहेत. शेलूवाडा (ता. कारंजा) येथील शेतकऱ्यांनी मोरे यांच्याबाबत कारंजा गट विकास अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांनी चौकशी करुन संबंधित कर्मचाऱ्यास कार्यमुक्त करण्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला होता. Washim zp
शेलुवाडा येथील शेतकरी शेख कलीम शेख हबीब आणि सय्यद सादिक युसुफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार तांत्रिक अधिकारी रणजीत मोरे यांनी विहीर मंजुरीसाठी वीस हजार रुपयाची मागणी केली होती. ज्यांनी पैसे दिले त्यांच्या विहिरींना मंजुरी दिली होती आणि ज्यांनी पैसे नाही दिले त्यांच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याचे सांगून प्रस्ताव फेटाळण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. याबाबत विविध वर्तमानपत्रात वृत्त प्रसारित झाले होते. या बाबीची गंभीर दखल घेत सीईओ वैभव वाघमारे यांनी रणजीत मोरे यांना कंत्राटी सेवेमधून तडकाफडकी कार्यमुक्त केले आहे. Washim zp
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि शेतीचा अधिकाधिक भाग सिंचनाखाली यावा याकरिता जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सिंचन विहिरींना मंजुरी देण्यात येत आहे. तसेच मागेल त्या शेतकऱ्यांना सिंचन विहीर देण्याची भूमिका जिल्हा प्रशासनाची असून याबाबत गैरप्रकार खपवून घेतल्या जाणार नाही. जिल्हा परिषद प्रशासना अंतर्गत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी यातून बोध घ्यावा व कोणत्याही प्रकारचे गैर कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घ्यावी."
-वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम
हेही वाचा