वाशिम, पुढारी वृत्तसेवा : समृद्धी महामार्गावरील सेलू बाजार टोल नाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर कार पाठीमागून जोरात आदळली. या भीषण अपघातात २ जण जागीच ठार झाले. तर २ जण गंभीर जखमी झाले. ही घटना आज सकाळी (दि.१५) ११.५० च्या सुमारास घडली. पराग सोनार (वय ४४), मुलगा अनुश पराग सोनार (वय ७, रा. नवी मुंबई) अशी मृतांची नावे आहेत. तर दिपाली पराग सोनार (वय ४०) व मुलगी रुजुल पराग सोनार (वय १७, रा. नवी मुंबई) अशी जखमींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी ११.५० च्या सुमारस नवी मुंबईवरून वर्ध्याकडे कार निघाली होती. ही कार (MH 43 BK 6284) समृद्धी महामार्गावरील सेलू बाजार टोलनाक्यावर उभ्या असलेल्या ट्रकवर (MH 04 9981) जाऊन पाठीमागून धडकली. या अपघाताची माहिती संजय इंगोले यांनी श्रीगुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांना दिली. त्यांनी तत्काळ जय गुरुदेव रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक अविनाश भोयर पाटील तसेच समृद्धी लोकेशन कारंजाचे डॉ. भास्कर राठोड, पायलट आतिश चव्हाण, सेलू बाजार लोकेशनचे पायलट सोनू पाटील, शिंदे, डॉ. आडोळे, मालेगाव लोकेशनला माहिती दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन जखमींना सेलू बाजार येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले.
या भीषण अपघातात कार ट्रकखाली घुसली होती. यात पराग आणि मुलगा अनुश अडकून पडले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी कारचा पत्रा कापून त्यांचे मृतदेह बाहेर काढले. उभा असलेल्या ट्रकचे ब्रेक फेल झाले होते, असे घटनास्थळावरून सांगण्यात आले.