Livestock heatwave protection
वाशिम : जागतिक तापमान वाढीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी उन्हाळ्यातील तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा किमान 1 ते 2 अंश सेल्सियसने वाढले आहे. याचा थेट परिणाम पशुधन व कुक्कुट पक्ष्यांवर होत आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात (हीट स्ट्रोक) व उष्णलहरींचा धोका निर्माण झाला असून, पशुधन आजारी पडणे किंवा दगावण्याची शक्यता वाढली आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ सरासरीपेक्षा अधिक तापमान राहिल्यास उष्णलहरीची स्थिती निर्माण होते. अशा परिस्थितीत पशुधनाच्या शरीरातील पाणी व क्षारांचे प्रमाण कमी होऊन निर्जलीकरण (डिहायड्रेशन) होते. परिणामी चारा व खाद्य घेण्याचे प्रमाण घटते व उत्पादकतेवर विपरीत परिणाम होतो.
उष्णलहरीपासून बचावासाठी पशुधनाला थंड वातावरणातून अचानक उष्ण वातावरणात नेणे टाळावे. जनावरांना केवळ दिवसाच्या थंड वेळेत चरायला सोडावे तसेच उष्ण काळात सावलीत किंवा हवेशीर निवाऱ्यात ठेवावे. वाढत्या तापमानाशी जुळवून घेण्यासाठी पशुधनाला हळूहळू सवय लावणे आवश्यक आहे.
लहान वासरे, करडे, काळ्या किंवा गडद रंगाचे प्राणी, श्वसनाच्या आजाराने ग्रस्त जनावरे, वराह व दुभती जनावरे तसेच कुक्कुट पक्षी यांना उष्माघाताचा विशेष धोका असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
उष्माघाताची लक्षणे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये धाप लागणे, श्वासाचा वेग वाढणे, पाणी जास्त प्रमाणात पिणे, चारा कमी खाणे, सुस्ती येणे, लाळ गाळणे, नाकपुड्या कोरड्या पडणे व शरीरातील पाणी-क्षारांचे प्रमाण कमी होणे अशी लक्षणे दिसून येतात. अशी लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. तुषार बावणे यांनी केले आहे.