वर्धा : गांजा अमली पदार्थाची तस्करी करणार्यांवर कारवाई करत पोलिसांनी २० किलो गांजा जप्त केला. या कारवाई पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना मिळालेल्या माहितीवरून वर्धा रेल्वे स्टेशन गेट समोरील, वर्धा - सावंगी (मेघे) रोडलगत असलेल्या दुकानाजवळ सापळा रचून कारवाई केली. सुरज शंकरसिंग चव्हाण (वय २७), रा. बंगाली कॅम्प चंद्रपुर, ह.मु. बेसा टि-पॉईंट, विजय नामदेराव दुधकवरे (वय ३३) रा. इंदिरानगर आर्वी नाका वर्धा, हे यश सुरेश बेमाल (वय २८) रा. सावंगी (मेघे), वर्धा, अमिर नाशिर खॉ पठान रा. इंदिरानगर आर्वी नाका वर्धा याच्या सांगण्यावरून रेल्वेने ओडिसा येथे गेले.
तेथून मदन सा नावाच्या इसमाकडून गांजा अंमली पदार्थ खरेदी केला. तो दोन सुटकेसमध्ये भरून, वर्धा रेल्वे स्टेशन येथे परत आले, अशी माहिती पुढे आली. गांजा घेण्याकरीता यश बेमाल व अमिर पठाण हेसुध्दा घटनास्थळी कारने आले होते. अमिर पठाण यास पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला. अन्य तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी ४ लाख २ हजार २२० रुपये किमतीचा २०.१११ किलोग्रॅम गांजा अंमली पदार्थ, मोबाईल, सुटकेस असा ५ लाख ३ हजार २२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पसार आरोपींचा शोध स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, बालाजी लालपालवाले, मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, रवि पुरोहित, अक्षय राऊत, विनोद कापसे, अभिषेक नाईक, फॉरेन्सिक विभागाचे अनिल साटोणे, अजित धांदरे, मंगेश धामंदे यांनी केली.