नागपूर, पुढारी वृत्तसेवा : योग्य वेळी भाकरी फिरवली असती तर ही वेळ त्यांच्यावर आलीच नसती, योग्य वेळी भाकरी फिरवली असती, आणि २०१४ पासून ' कहीं पे निगाहें कहीं पे निशाना' न करता जे ठरलं ते केल असतं, तर कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांची विश्वास राहिला असता. मला आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोन्ही नेत्यांबद्दल प्रचंड सहानुभूती वाटते. भाजपवर टीका करण्यापूर्वी त्यांनी स्वतः आत्मचिंतन करायला पाहिजे. तुमच्या स्वभावामध्ये संघटन कौशल्य असते, आपले कार्यकर्ते लोकप्रतिनिधी टिकवता आले असते, तर अशी वेळ आलीच नसती. वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खंजीर कोणी खुपसला? असा सवाल मुनगंटीवार यांनी उपस्थित केला.
मुनगंटीवार म्हणाले, मी कृषीमंत्री असताना ८० हजार कोटोंचे पॅकेज दिल्याचे ते सांगतात मग शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, त्याचे काय कारण होतं ? खरेतर आता दौरा काढून काही होणार नाही. अजून काही लोक संपर्कात आहेत, ते लोक आता लवकरच त्यांना टाटा बाय-बाय करतील असा दावा केला. खातेवाटप संदर्भात बोलताना ते लवकरच होईल. खातेवाटप झालं नाही म्हणून काम होत नाही असे नाही. आम्ही आहोत काम सुरूच आहे. आमच्याकडून काढून इतरांना द्यायचे आहे. उशीर होण्याचे कारण म्हणजे विस्तार व्हायचा आहे, त्यानंतर खाते वाटप होईल.
उद्धव ठाकरे विदर्भात दौरा करत आहेत, पण कोरोनात उद्धव ठाकरे यांनी दौरा केला असता तर कदाचित एकनाथ शिंदे हे भाजपसोबत आलेच नसते. तेव्हा काही करू शकले नाही, घरी बसले त्यामुळे आता दौरा करावा लागतो व कष्ट करावे लागतात. उद्या कोणीही मोठा नेता नाराज झाला तर, तो वाटोळं करू शकतो, हा त्याचा भाग आहे. त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही. दरम्यान, अपात्रतेबाबत नोटीस दिल्याने अपात्रता होत नाही, काही संविधान आहे, काही कायदे आहे, काही नियम आहे, उद्या कोणी नोटीस देऊ शकते, तुमच्यामध्ये पक्षच नाही आहे. तुमची उद्धव ठाकरे यांची शोले चित्रपटासारखी अवस्था झाली आहे. आधा इधर आधा उधर , मनात तुम्ही फक्त एकटेच फिरत आहेत अशी टीका मुनगंटीवार यांनी केली.