चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा: वाढलेले प्रदूषण, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि आरोग्याच्या समस्या पाहता मोठ्या प्रमाणात अक्षय ऊर्जा निर्मितीची गरज आहे. विदर्भातील चंद्रपूर सारख्या प्रदूषित क्षेत्रात नितांत आवश्कता आहे. सरकारने रुफ टाँप सौर उर्जेसाठी सरसकट व्यक्ती आणि संस्थांना एकूण खर्चाच्या 50 टक्के अनुदान आणि प्रोत्साहन दिल्यास अक्षय ऊर्जा निर्मितीत वाढ होवू शकते, अशी मागणी ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी राज्य सरकारला केली आहे. आज अक्षय ऊर्जा दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना सौर ऊर्जेकडे वळण्याचे आवाहन केले.
देशात प्रदूषण विरहित ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून २००४ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग ह्यांनी राजीव गांधी ह्याच्या जन्म दिनानिमित्ताने २० ऑगस्ट रोजी अक्षय ऊर्जा दिवस साजरा करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशात अपारंपारिक ऊर्जा मंत्रालय स्थापित झाले. मोदी सरकारच्या काळात शून्य कार्बन उत्सर्जन करण्याच्या प्रयत्नाला चालना देण्यासाठी अक्षय उर्जेला चालला देण्यात आली. यामध्ये भारत जगात आघाडीवर राहिला . देशात आज ४१६ गीगावॅट ऊर्जा निर्मिती होते त्यात अक्षय ऊर्जा केवळ १५० गीगावॅट आहे. महाराष्ट्रात अक्षय ऊर्जा निर्मिती ११४०० मेगावॅट होत आहे, परंतु वाढत चाललेल्या थर्मल पॉवर स्टेशनमुळे प्रदुषनात मोठी वाढ झाली आहे. हवामान बदलाच्या घटनांमुळे पारंपरिक ऊर्जा थांबवून अक्षय ऊर्जा निर्मितीवर भर देणे गरजेचे असल्याचे चूने यांचे म्हणणे आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील वाढते तापमान पाहता जिल्ह्यात सर्वाधिक सौर ऊर्जा निर्मिती होऊ शकते. याकरिता घरोघरी छतावर सौर ऊर्जा पॅनल द्वारे शहराला लागणारी ऊर्जा निर्मिती करता येते. थर्मल पॉवर स्टेशन्स ला थांबवायचे असेल, हा उत्तम पर्याय आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सर्व लहान मोठ्या प्लांट मधून ५००० च्या वर थर्मल ऊर्जा निर्माण होते. ह्यातून मोठे प्रदूषण होते, परंतु त्यामानाने अक्षय ऊर्जा निर्मिती होत नाही. सिटीपीएस कडून ३०० मेगावॅट सौर उर्जेचा प्रस्ताव अजून पडून असून केवळ ५ मेगावट ऊर्जा निर्मिती सुरु आहे. मात्र, आनंदाची बाब अशी की, जिल्ह्यात रुफटॉप ऊर्जा निर्मिती १० मेगावट पर्यंत पोहचली आहे. केवळ शहरात शासकीय आणि खाजगी इमारतीवर सौलर रुफ टॉप प्लांट लावले. तर शहरात १०० मेगावट पर्यंत आणि जिल्हाभरात शेती आणि रहिवासी क्षेत्रात २०० मेगावॅटच्या वर अक्षय ऊर्जा निर्मिती होऊ शकते.
महाराष्ट्रात २० च्या वर थर्मल पॉवर प्लांटस आहेत. त्यातून हवेत मोठ्या प्रमाणावर राख आणि विषारी वायू सोडली जाते. जल प्रदूषण सुद्धा मोठ्या प्रमाणावर होते. राज्यात नैसर्गिक सौर ऊर्जा सतत उपलब्ध आहे. त्यातून मुबलक प्रमाणात ऊर्जा निर्मिती होऊ शकते. ह्या स्त्रोतातून उर्जा निर्मिती झाली तर राज्यात आणि देशात थर्मल पॉवर स्टेशनची गरजच भासणार नाही. त्यामुळे प्रदूषणावर मात करता येईल.
महाराष्ट्र शासनाच्याच्या आकडेवारी नुसार राज्यात एकूण ऊर्जा निर्मिती क्षमता ३८,००० मेगावॅट आहे.( महाजेनको-१३,१५२.०६,). अक्षय ऊर्जा निर्मिती २०२३ पर्यंत ही केवळ ११४०० मेगावँट आहे. त्यात सोलार-४०९४.०६ मेगावॅट, वायूउर्जा -२८३९ मेगावॅट ,जैविक ऊर्जा -२४९०.०० मेगावॅट, लघु जल विद्युत -३२०.६८ मेगावॅट ,मुनिसीपल सोलिड वेस्ट-०४ मेगावॅट आहे.
देशात अक्षय उर्जेची स्थिती जुलै २०२३ पर्यंत एकूण उर्जानिर्मीति ४१६ गीगावॅट असून त्यात कोळसा आधारित ऊर्जा २११.०६ गीगावॅट असून त्याचे एकूण प्रमाण ५१.२० टक्के आहे. त्याच सोबत आण्विक,नैसर्गिक वायू आणि डीझल मिळून ३२ गीगावॅट आणि अक्षय ऊर्जा केवळ १५० गीगावॅट आहे. (मोठे जल विद्युत -४६.८५ गीगावॅट , पवन ऊर्जा- ४२.८ गीगावॅट, सौरउर्जा-६७.७ गीगावॅट, जैविक ऊर्जा -१०.२ ,.लघु जलऊर्जा- ४.९४ )
आज वाढलेले प्रदूषण, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती आणि आरोग्याच्या समस्या पाहता देशाला आणि जगाला पर्यावरण वाचवायचे असेल. आणि हवामानाचे धोके टाळायचे असेल, तर नैसर्गिकरित्या उपलब्ध सौर ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा पर्याय असल्याचे ग्रीन प्लानेट सोसायटीचे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी राज्य सरकारला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
हेही वाचा