अकोला : पुढारी वृत्तसेवा : संसदेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बोलू दिले जात नव्हते. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने लोकशाहीची क्रूर थट्टा चालविली आहे. आता या संदर्भात जनतेनेच आवाज उठवण्याची गरज आहे, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले. स्वराज्य भवनात महानगर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर आंदोलन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खऱ्या गोष्टीसाठी व राष्ट्रीय हितासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेच्या अधिवेशनात आपला आवाज उठविला. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची मुस्कटबाजी करून त्यांना संसदे बाहेर काढले आहे. ही लोकशाहीची क्रूर थट्टा आहे. लोकशाहीवर असीम श्रद्धा असणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी या संदर्भात संसदेच्या बाहेर आपला आवाज उठवावा. काँग्रेस राज्य व राष्ट्रीय पातळीवर अभिनव आंदोलने करून मोदी सरकारला सत्तेतून खाली खेचणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी प्रशांत गावंडे, मदन भरगड, मनपा नेते साजिद खान पठाण, जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष पूजाताई काळे, प्रदेश इंटक नेते प्रदीप वखारिया, अॅड. महेश गणगणे, माजी उपमहापौर निखिलेश दिवेकर, महानगर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष पुष्पाताई देशमुख, जि. प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, माजी नगरसेवक इरफान, मोंटू खान, मागासवर्गीय काँग्रेसचे नेते प्रमोद डोंगरे, विजय देशमुख, कपिल रावदेव, अतुल अमानकर, तसवर पटेल, संजय मेश्रामकर, शेख हनीफ, पंकज देशमुख, अंशुमन देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा