नागपूर : मराठवाड्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी करण्यात येत असताना अर्थमंत्री अजित पवार म्हणाले पैशाचे सोंग आणता येत नाही, तिजोरीची अवस्था खराब आहे म्हणून सरकार शेतकऱ्यांना जिवाचे बरेवाईट करू देणार का? असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता दौरे करत आहेत पण हा केवळ देखावा आहे. मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांनी विचारले किती मदत देणार, तर ते म्हणतात राजकारण करू नका! शेतकऱ्यांनी मदतीबाबत प्रश्न विचारला यात राजकारण कुठे आहे? सरकार जर बांधावर गेल आहे तर का जनतेला ठोस आश्वासन देत नाही, मदत किती देणार हे का लपवत आहे? याचा अर्थ मदत करण्याची नियत सरकारची नाही, ही बनवाबनवी आहे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.
अर्थमंत्री अजित पवार यांना शेतकरी कर्जमाफीची मागणी केल्यावर ते का भडकतात? एक वर्षाआधी निवडणुकीच्या वेळी शेतकरी कर्जमाफी करू ही घोषणा याच पक्षांनी केली होती ना? आता पैशाचे सोंग आणता येत नाही ही कारणे का देत आहेत? लाडक्या बहिणींचे कारण सरकार देत आहे मग ती योजना पण मते मिळवण्यासाठी होती ना? शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, सोयाबीनवर किड आलेली आहे. शेतकऱ्यांना पीकविमा पैसे मिळणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. मराठवाड्यातील पुरात शेतकऱ्यांचे फक्त पीक गेले नाही तर जमिनी खरवडून निघाल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त मदत केली पाहिजे.
सर्वपक्षीय आमदारांनी वेतन द्यावे यासाठी मी सहा महिन्याचे आमदार वेतन मुख्यमंत्री सहायता कक्षाला देणार असल्याचे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय आमदारांनी देखील आपले वेतन द्यावे असे आवाहन केले.