नागपूर : विदर्भातील शेतकरी समृद्ध संपन्न झाला पाहिजे, याच उद्देशाने अॅग्रोव्हिजन प्रदर्शन सुरू करण्यात आले. स्मार्ट व्हिलेजेस निर्माण व्हावीत, शेतमालाला चांगली बाजारपेठ मिळावी, शेतकऱ्यांचा नफा वाढावा, जोडधंद्यातून रोजगाराची साधने निर्माण व्हावीत, हाच आमचा उद्देश असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (दि.19) केले. यावेळी माजी खासदार रामदास तडस, श्रीधर ठाकरे, श्री. डॉ. घोष, सुधीर दिवे, रवी बोरटकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, ‘आपल्याला संधी कुठे आहे हे शोधले पाहिजे. त्यानंतर यश मिळेल याच दृष्टीकोनातून प्रयत्न करायला हवेत. यंदा अॅग्रोव्हिजन १५ व्या वर्षांत पदार्पण करतेय. मध्य भारतातील सर्वांत मोठं कृषी प्रदर्शन म्हणून मान्यता मिळाली. या यशात शेतकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. मी आज भोपाळ दौऱ्यावर होतो. त्यावेळी मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रदर्शनाला येण्याची इच्छा व्यक्त केली, आपल्या अनेक गोष्टींचे अनुकरण करण्याची इच्छा असल्याचेही ते म्हणाल्याचे सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात काऊ फार्म तयार होतील यादृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वप्रकारची मदत करायला मी तयार आहे. फार्मर प्रोड्युस कंपन्या निर्माण केल्या जाव्यात. ते काम सुरु झाले आहे. शेतीला आणि शेतकऱ्यांना नक्कीच फायदा होऊ शकतो.