Sanjay Nirupam vs Uddhav Thackeray
नागपूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता फक्त मुलाखती, पत्रकार परिषदेसाठी टीव्हीवर उरलेले नेते आहेत, अशी टीका शिंदेसेनेचे नेते माजी खासदार संजय निरुपम यांनी केली आहे. ते नागपुरात वार्तालाप कार्यक्रमात बोलत होते.
"ऑपरेशन टायगर' हे पत्रकारांनी दिलेले नाव आहे. खरे तर उद्धव ठाकरे गटातील अनेक खासदार आणि आमदार एकनाथ शिंदे यांच्या कामावर आणि हिंदुत्वाच्या भूमिकेवर विश्वास ठेवून आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांशी तडजोड केली, असा आरोप केला. निरूपम यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर स्वतःचा पक्ष चालवण्याऐवजी ते विलीनीकरणाची दुर्दैवी भाषा करत आहेत.
दरम्यान, अशोक खरात सारखे भोंदु बाबा अनेक वेळेला राजकारण्यांसोबत संपर्क वाढवतात. कुण्या नेत्यांची छायाचित्रे असली म्हणून नेते वा राजकारणी चुकीच्या कामांचे समर्थन करतात, असा अजिबात होत नाही. आसाराम बापूंकडे मोदींसह इतर पक्षांतील अनेक नेते गेले होते. एकनाथ शिंदे अशोक खरातकडे गेले असतील. याचा अर्थ ते त्याच्या चुकीच्या कामांचे समर्थन करीत नाही, असेही निरूपम यांनी स्पष्ट केले.