Nagpur Sandip Joshi Political Retirement Issuse
राजेंद्र उट्टलवार
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिवलग मित्र, मानद सचिव म्हणून थेट जनता आणि त्यांच्यातील दुवा म्हणून कधीकाळी काम करणारे आमदार संदीप जोशी आपल्या राजकीय संन्यास घेण्याच्या निर्णयावर दुसऱ्या दिवशीही असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठीनंतर ठाम आहेत.
आपण मुख्यमंत्र्यांशी बोलून हा निर्णय घेतला असल्याने ते डावोस दौऱ्यावरून आल्यानंतर 25 जानेवारी रोजी स्थानिक नेते, कार्यकर्ते त्यांना भेटणार आहेत. यानंतर आपणही भेटू, हक्काने भांडणही करू नंतरच पुढील भूमिका ठरविणार असे मंगळवारी (दि.२०) आमदार संदीप जोशी यांनी ''पुढारी''शी बोलताना स्पष्ट केले. एकंदरीत हा राजकीय निवृत्तीचा क्लायमॅक्स यानंतरच संपणार आहे.
मी मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतल्याने आजही निर्णयावर ठाम आहे. विशेष म्हणजे दोघेही जीवलग मित्र सावलीसारखे सोबत राहिले आहेत. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना संदीप जोशी देवगिरीवर मानद सचिव म्हणून जनतेशी सुसंवाद साधत होते. मात्र, मुख्यमंत्र्यांशी न बोलता मी हा निर्णय घेतला असेच सर्वांना वाटत आहे. यामुळे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते म्हणतात आम्ही बोलू त्यांनी जाऊ दिले तर तुम्ही ठाम राहा. मी पण सांगितले त्यांना भेटल्यावर निर्णय घेणार. मुख्यमंत्र्यांशी संवाद झाल्यावर आपली भूमिका,पत्र मागे घेणार का प्रश्नाचे उत्तर देणे मला सध्या तरी शक्य नाही. मात्र 13 मे आमदारकीची मुदत संपल्यावर मी फक्त भाजपचा कार्यकर्ता असेल असेही आमदार जोशी यांनी स्पष्ट केले. एक मात्र खरे की यानिमित्ताने भाजपमधील मनपा निवडणुकीतील सुप्त नाराजी उघड झाली.
गेल्या 24 तासात कार्यकर्त्यांचा आग्रह त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातील गर्दीवरून कायम आहे. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्रजी वेळ देत नाहीत. म्हणून आम्हाला त्यांचा आधार आहे. त्यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
माझी भूमिका ठाम आहे. काही आमदार, नेते देखील काल भेटले. तुला देवेंदजीनी यासाठी हो कसे म्हटले. मी स्वतः 25 रोजी जवळचे लग्न असल्याने बाहेरगावी आहे. पक्षातील कार्यकर्त्यांसाठी ही लढाई.70 वर्षाचे लोक 7 टर्म लढले, तिकीट मिळाली नाही म्हणून नाराज, माझ्या रक्तात भाजप आहे. नव्या रक्ताला वाव दिला पाहिजे. मी फक्त भाजपचा कार्यकर्ता राहणार आहे. कार्यकर्त्यांना तिकीट मिळाले नाही, म्हणून ही भूमिका नाही. माझा निर्णय ठाम आहे. इतके दोघांचे वर्षानुवर्षे जुने संबंध राहिले आहेत. एकदा मुख्यमंत्री देवा भाऊशी बोलणार, प्रसंगी भांडणही होणार हे बोलताना ते काहीसे भावनिक झाले. आज मुख्यमंत्र्यांचे ओएसडी देखील त्यांच्या भेटीला येऊन गेले.
या निर्णयात कुठलेही दबावतंत्र नाही, हा आरोप म्हणजे शुद्ध वेडेपणा आहे. ते माझ्या रक्तात नाही. आपल्या आईसारखा माझ्यासाठी भाजप पक्ष आहे विरोधक काहीही बातम्या पसरवतात. आज राजकारणात कुणी थांबायला तयार नाही. मी कधी, कुठेही नाराज नाही यावर त्यांनी भर दिला.