नागपूर: बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात मान्सूनचा मुक्काम लांबला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होणार असून, यामुळे किमान ३० सप्टेंबरपर्यंत तरी मान्सून राज्याचा निरोप घेण्याची शक्यता नाही.
सध्याच्या हवामान अंदाजानुसार २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस अपेक्षित आहे, जो प्रामुख्याने दुपारनंतर पडेल. कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव २६ तारखेपासून जाणवण्याची शक्यता आहे. या दिवशी विदर्भ आणि मराठवाड्यातील पूर्व आणि दक्षिणेकडे असलेल्या भागांमध्ये दुपारनंतर पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. २७ तारखेला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसात वाढ होऊ शकते आणि यातील काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस देखील पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ तारखेला राज्यातील पश्चिम भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहू शकतो. यादृष्टीने शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे.
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात विविध ठिकाणी पाऊस वाढण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार आपल्या शेतीचे नियोजन करावे आणि काढणी केलेल्या पिकांचे वादळी वाऱ्यापासून आणि पावसापासून संरक्षण करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.