शासनाने वारंवार घोषणा करूनही ओबीसी विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळू न शकल्याच्या निषेधार्थ गुरुवारी (दि.1) ओबीसी विद्यार्थ्यांनी उमरेड रोड बहादुरा परिसरातील पांडव कॉलेज जवळील ओबीसी वसतिगृहावर धडक देत ठिय्या आंदोलन केले. उमेश कोराम यांच्या नेतृत्वाखाली आपले सामान घेऊन 40 विद्यार्थी या आंदोलनात सहभागी असून सायंकाळी 5 पर्यंत वाट बघू नाहीतर आत जाऊ,15 ऑगस्टला वसतिगृह सुरू करू असे सांगितले जाते यामुळे आता शासनाने 6 हजार रुपये निर्वाह भत्ता आम्हाला द्यावा अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे.
संपूर्ण देशभरात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकही स्वतंत्र वस्तीगृह नाही. ओबीसी संघटनेच्या सततच्या रेट्यामुळे शासनाने राज्यात 72 वस्तीगृह मंजूर केलेत. मात्र,मागील सात वर्षापासून शासन फक्त ओबीसी विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वस्तीगृह सुरू करू अशी घोषणा करत आहे. मागील सत्रात इमारत नाही म्हणून वस्तीगृह सुरू केले नाही. या सत्रात इमारती आहेत तर फर्निचर नाही म्हणून वस्तीगृह सुरू होत नाहीत.
ओबीसी मंत्र्यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी वस्तीगृह सुरू करू असे पावसाळी अधिवेशनात सांगितले होते. परंतु एक ऑगस्ट 2024 पर्यंत शासनाने एकही वस्तीगृह सुरू केलेले नाही. गरीब ग्रामीण मागासवर्गीय ओबीसी विद्यार्थी शासनाच्या या लेटलतीफपणाला कंटाळलेला आहे. विद्यार्थ्यांना आर्थिक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ओबीसी विद्यार्थी वस्तीगृहाअभावी भाड्याच्या खोलीत वास्तव्य करीत आहेत याकडे ओबीसी युवा अधिकार मंचने आज लक्ष वेधले. विद्यार्थ्यांच्या वतीने शासनाला कळवले गेले होते की जर 31 जुलै पर्यंत शासनाने वस्तीगृह सुरू केले नाहीत तर 1 ऑगस्ट रोजी विद्यार्थी स्वतः वस्तीगृहाचा ताबा घेतील. यासाठीच विद्यार्थ्यांनी वसतिगृहात धडक दिल्याची माहिती ओबीसी युवा अधिकार मंचचे मुख्य संयोजक उमेश कोर्राम यांनी दिली.