नागपूर, पुढारी वृत्तसेवा : ओबीसींच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय ओबीसी महासंघाने आता राज्यात पुढे येऊ पाहणाऱ्या तिसऱ्या आघाडीत सहभागी होण्याची मानसिकता तयार केली आहे. याविषयीचे स्पष्ट संकेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने तिसऱ्या आघाडीत कुठले राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सहभागी होतात, त्यांचा काय अजेंडा असतो, यानुसार आमची भूमिका निश्चित केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कुठलेही सामाजिक संघटन बळकट, सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने भक्कम झाल्यानंतर त्याला राजकीय क्षेत्रात पाय रोवावे लागतात, यात काही गैर नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात ओबीसींच्या प्रश्नावर ओबीसी महासंघ देखील राजकारणात उतरू शकतो, असे यावेळी तायवाडे यांनी सांगितले.
आम्ही सुरुवातीपासून जो ओबीसी हित की बात करेगा, वही देश मे राज करेगा.. या भूमिकेतून काम करत आहोत. यामुळे तिसऱ्या आघाडीत आम्हाला सन्मान, सन्मानपूर्वक वागणूक मिळाली. तर आम्ही त्याचा नक्कीच विचार करू, असेही ते म्हणाले. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत राजकीय भूमिका घेण्याच्या दृष्टीने सुरू केलेली वाटचाल आणि निवडणूक लढविण्याची तयारी तयारी पाहू. जाता आता ओबीसी महासंघाच्याही या भूमिकेला राजकीयदृष्ट्या अर्थ आला आहे. अर्थातच असे झाल्यास त्याचा फटका महायुती आणि मविआ दोघांनाही बसू शकतो.