Youth Congress Samvidhan Sanman Yatra Pudhari
नागपूर

Congress Protest Nagpur | मनुस्मृतीच्या निषेधार्थ नागपुरात युवक काँग्रेसची ‘संविधान सन्मान यात्रा’; रेशीमबागेत पोलिसांनी मोर्चा अडवला

बॅरिकेड्सवर चढून कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, मनुस्मृतीचे दहन, भाजप-आरएसएसविरोधात निषेध

पुढारी वृत्तसेवा

Youth Congress Samvidhan Sanman Yatra

नागपूर : मनुस्मृतीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने नागपुरात आयोजित केलेल्या ‘संविधान सन्मान यात्रे’मुळे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. एनआयटी कर्मचारी सांस्कृतिक भवन येथून सुरू झालेला हा मोर्चा रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या दिशेने निघाला होता. शेकडो कार्यकर्ते सहभागी झालेल्या या मोर्चाला सुरेश भट सभागृहाजवळ पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत भाजप आणि संघाविरोधात निषेध नोंदवला.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे आणि प्रदेश सहप्रभारी नवज्योत सिंग संधू यांच्या नेतृत्वाखाली या यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने तरुणीही या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. अनेक आंदोलकांच्या हातात भारतीय संविधानाच्या प्रती होत्या.

रेशीमबागेकडे जात असताना पोलिसांनी अडवले

एनआयटी कर्मचारी सांस्कृतिक भवन येथून मोर्चाला सुरुवात झाल्यानंतर आंदोलक रेशीमबागच्या दिशेने पुढे सरकत होते. सुरेश भट सभागृहाजवळ पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स उभारून मोर्चाचा मार्ग रोखला. मोर्चा अडवल्यानंतर काही काळ आंदोलक आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी पुढे जाण्यास मज्जाव केल्यानंतर काही आंदोलक बॅरिकेड्सवर चढले. यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ‘दादागिरी नहीं चलेगी’, ‘माफी मांगो’ अशा घोषणांसह भाजपविरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. परिसरात काही काळ घोषणांचा गजर सुरू होता.

मनुस्मृतीचे दहन करून निषेध

आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मनुस्मृतीचे दहन करून निषेध व्यक्त केला. संविधानाचा सन्मान आणि त्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी ‘संविधान सन्मान यात्रा’ काढण्यात आल्याचे युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले.

“देशाचा कारभार संविधानानुसारच चालला पाहिजे, मनुस्मृतीच्या विचारांनुसार नाही,” अशी भूमिका आंदोलकांनी मांडली. संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्याची गरज असल्याचे सांगत युवक काँग्रेसने मनुस्मृतीच्या विचारसरणीविरोधात आपली भूमिका स्पष्ट केली.

खरगे यांच्याबाबत माफीची मागणी

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याबाबत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून करण्यात आलेल्या कथित वक्तव्यांवरूनही आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेतली. संबंधित वक्तव्याबद्दल भाजप आणि संघाने माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी रेशीमबाग परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मोर्चा पुढे जाऊ नये यासाठी बॅरिकेड्स उभारण्यात आले होते. पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर काही काळ तणाव निर्माण झाला; मात्र परिस्थितीवर पोलिसांनी नियंत्रण ठेवले.

संविधानाचा सन्मान आणि मनुस्मृतीचा निषेध या मुद्द्यांवरून युवक काँग्रेसने घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे नागपुरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, या आंदोलनाची शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT