Vijay Wadettiwar  Pudhari
नागपूर

Vijay Wadettiwar | एसबीएल कंपनीतील स्फोट अपघात नसून हत्याकांड: दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; विजय वडेट्टीवार

विधानसभेत नागपूर येथील कंपनीतील स्फोट प्रकरणावर लक्षवेधी उपस्थित करण्यात आली

पुढारी वृत्तसेवा

Nagpur SBL Company Blast

नागपूर : नागपूर येथील एसबीएल कंपनीत झालेला भीषण स्फोट ज्यामध्ये आतापर्यंत २२ निष्पाप कामगारांचा बळी गेला, तो हलगर्जीपणा नसून प्रशासकीय आणि मालकांच्या संगनमताने केलेले 'हत्याकांड' आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला.

त्यानंतर मंत्र्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने विरोधकांनी सरकारचा धिक्कार करत सभात्याग केला. या प्रकरणातील एफआयआर मधील त्रुटी आणि सुरक्षा नियमांच्या पायमल्लीवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. विधानसभेत नागपूर येथील कंपनीतील स्फोट प्रकरणावर लक्षवेधी उपस्थित करण्यात आली.

वडेट्टीवार यांनी प्रश्न उपस्थित केला की, ज्या घटनेत २२ लोकांचा जीव गेला, त्या घटनेच्या एफआयआरमध्ये अशी कलमे का लावली गेली. ज्यामुळे आरोपींना दुसऱ्याच दिवशी जामीन मिळेल? मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला गेला नाही? हे सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

दरम्यान, या कंपनीत प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या धक्कादायक बाबींचा पाढा वडेट्टीवार यांनी वाचला, कंपनीत फायर पंप नव्हते, रिस्क असेसमेंट केले नव्हते.नियमानुसार दोन सेफ्टी ऑफिसर हवे असताना फक्त एकच होता. फॅक्टरी मेडिकल ऑफिसर म्हणून नियुक्त केलेले डॉ. शशांक डोंगरे हे कधीच तिथे गेले नाहीत.कंपनीत सीसीटीव्ही नव्हते आणि इंटरनल सेफ्टी ऑडिटची कोणतीही नोंद नाही. स्फोटक हाताळण्याचे कोणतेही प्रशिक्षण कामगारांना दिले गेले नव्हते अशीही माहिती वडेट्टीवार यांनी सभागृहाला दिली.

तपासणी न करणारे अधिकारी करा निलंबित

पेसोचे मुख्यालय नागपुरात असूनही तेथील अधिकारी कधी तपासणीला गेले नाहीत. कामगार अधिकारी आणि निरीक्षकांनी केवळ पैसे घेऊन लोकांच्या जीवाशी खेळ मांडला आहे, असा घणाघाती आरोप वडेट्टीवार यांनी केला. ज्या निरीक्षकाने हे सर्व सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र दिले, त्याला तात्काळ निलंबित करून त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या प्रश्नावर मंत्र्यांच्या कायदेशीर दृष्ट्या जे शक्य असेल ते करू या विधानाचा समाचार घेताना वडेट्टीवार म्हणाले की, दीड वर्षात इतके स्फोट झाले तरी सरकार काय कारवाई करत आहे? अधिकाऱ्यांना पाठीशी का घालत आहेत? हे हत्याकांड करणाऱ्यांना सरकार शिक्षा देण्यात कुचराई करत आहे.

मंत्र्यांनी कंपनी मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. संबंधित सुरक्षा निरीक्षक आणि पेसो अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करून त्यांना सहआरोपी करावे. स्फोटकांचा प्रत्यक्ष साठा आणि परवानगी यांचा ताळमेळ तपासावा, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT