Nagpur SBL blast compensation
नागपूर: नागपूर जिल्ह्यातील एसबीएल कंपनीत रविवारी सकाळी झालेल्या भीषण स्फोटामध्ये आतापर्यंत 19 कामगार मृत्युमुखी पडले असून 23 जण जखमी आहेत. जखमींपैकी 13 जण 70 टक्क्यांपर्यंत जळाल्याने गंभीररित्या जखमी आहेत. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 82 लाख तर जखमींना 25 लाख रुपये दिले जातील. जे जे अधिकारी दोषी असतील त्या सर्वांवर गुन्हे दाखल होतील, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी (दि.२) दिली.
घटना कशामुळे झाली याचा प्राथमिक रिपोर्ट आला आहे. यात ही घटना निष्काळजीपणामुळे झाल्याचे समोर आले आहे. एका महिन्यात अंतिम रिपोर्ट येईल.. जे जे दोषी आढळतील, सर्वांवर कारवाई होईल.आज संध्याकाळपर्यंत सर्व मृतदेहांची डीएनए चाचणी पूर्ण होईल असेही सांगितले.
सोमवारी यासंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते. जखमींपैकी 13 जण गंभीररित्या जखमी आहेत. दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल होऊन कारवाई होईल. शेवटी हलगर्जीपणा करणारे अधिकारी दोषी असतील तर त्यांच्या विरोधात कारवाई का करू नये असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, आज बैठकीत निर्णय झाले त्यानुसार पेसोचे अधिकारी डिश चे अधिकारी आणि कामगार आयुक्त या विभागांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. या सर्वांनी गेल्या वर्षभरात हवे तसे काम केले नाही. विभागीय आयुक्त आणि जिल्हा पोलिस अधीक्षक त्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई शिफारस करतील.
त्यानंतर या अधिकाऱ्यांवर (पेसो, डिश, कामगार विभाग ) गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेतला जाईल. दरम्यान केंद्र सरकारकडेही या संदर्भात रिपोर्ट पाठवले जाईल. केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्याशी चर्चा झाली आहे. गोयल यांनी गेल्या काही काळात झालेल्या स्फोटांची माहिती मागितली आहे. जोवर ही कंपनी बंद राहील, तोवर कामगारांना पगार दिले जाईल.कंपनी पुन्हा सुरू झाल्यानंतर खबरदारी म्हणून त्यांच्या स्किल डेव्हलपमंटबद्दल प्रशिक्षण दिले जाईल. एसबीएल कंपनीमध्ये काही कामगारांचे मुळीच प्रशिक्षण झाले नव्हते असेही त्यांनी स्पष्ट केले.
मृतांच्या वारसांना कंपनीकडून 75 लाख रुपये, राज्य सरकार कडून 5 लाख तर केंद्र सरकार कडून 2 लाख रुपये असे एकूण 82 लाख रुपये नुकसान भरपाई दिली जाईल. जखमींना 25 लाख रुपये दिले जाईल. याशिवाय जखमींच्या पुनर्वसनासाठी विशेष योजना आखून पुनर्वसन केले जाईल.