नागपूर - मुलीचे अपहरण करून लग्न केल्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेल्या उत्तरप्रदेशातील एका युवकाने जरीपटका पोलिस स्टेशनच्या कोठडीतच गळफास घेत आत्महत्या केल्याच्या घटनेने आज गुरुवारी खळबळ माजली.
पोलिस ठाणेदारासह नाईट ड्युटी ऑफिसर आणि गार्ड ऑन ड्युटी अशा काही पोलिस कर्मचाऱ्यांवर या प्रकरणी निलंबन कारवाईची टांगती तलवार आहे. नागेंद्रकुमार रामजी भाटिया वय 19 वर्षे असे या तरुणाचे नाव आहे. इन्स्टग्रामच्या माध्यमातून उत्तर प्रदेशातील या तरुणाचे नागपुरातील एका युवतीशी प्रेमसंबंध जुळले. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुलीच्या कुटुंबीयांचा विरोध असल्याने तो आठ दिवसापूर्वी नागपुरात आला.
पळून जाऊन दोघांनीही अलाहाबाद येथे लग्न केले. मात्र इकडे मुलीच्या कुटुंबीयांनी या युवकाच्या विरोधात अपहरण केल्याची पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेशमधून स्थानिक पोलिसांच्या मदतीने पकडून नागपुरात आणले. न्यायालयासमोर हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटकेतील या युवकाने कोठडीत असताना पहाटेच्या सुमारास चादरीचा तुकडा फाडून त्याच्या सहाय्याने त्याने लोखंडी गजाला बांधून घेत गळफास लावला.
त्यापूर्वी काही वेळ अस्वस्थ मानसिकतेत त्याने कोठडीत येरझारा घातल्या मात्र कुणीही पोलिस कर्मचाऱ्यांना त्याच्याकडे लक्ष द्यावेसे वाटले नसल्याची माहिती पुढे आल्याने या प्रकरणी आता काहींचे निलंबन अटळ असल्याचे बोलले जाते.