Nagpur District Court News
नागपूर : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) आणि उच्च न्यायालय विधी सेवा उपसमिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीत विविध प्रकरणांचा जलद आणि सामंजस्याने निपटारा करण्यात आला.
उच्च न्यायालय विधी सेवा उपसमितीचे अध्यक्ष न्या. अनिल एस. किलोर यांनी नागरिकांना लोकअदालतीच्या माध्यमातून आपले वाद, प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्याचे आवाहन केले. न्या. रजनीश आर. व्यास यांनी या लोकअदालत पीठाचे नेतृत्व केले.
या राष्ट्रीय लोकअदालतीत मोटार अपघात दावे, जमीन संपादन अपील, लवाद (Arbitration) अपील तसेच कौटुंबिक वाद अशा विविध स्वरूपाच्या एकूण २०० प्रकरणांची सुनावणी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ३८ प्रकरणांचा यशस्वी तोडगा काढण्यात आला.
विशेष म्हणजे, राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांशी संबंधित वादांमध्ये दावेदारांना एकूण १२ कोटी ११ लाख ५५ हजार ६५४ रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. या प्रकरणांच्या यशस्वी निपटाऱ्यासाठी यवतमाळचे प्रकल्प संचालक बिजेवार, महाव्यवस्थापक निर्मल झाडे, एनएचएआयचे सल्लागार संगित राव, अॅड. अनिश कथाने आणि अॅड. हरीश डांगरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी तसेच अॅड. आयुषी डांगरे, अॅड. सी. ए. अँथनी, अॅड. अश्विनी आठल्ये, अॅड. स्विती बातिया, अॅड. कुणाल मिराचे आणि अॅड. डी. एन. कुकडे यांनीही लोकअदालतीच्या कार्यवाहीत सक्रिय सहभाग नोंदविला.
राष्ट्रीय लोकअदालतीच्या माध्यमातून न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अधिक दृढ होत असून, जलद व सुलभ न्यायाच्या दिशेने हे एक प्रभावी पाऊल मानले जात आहे.