Khasdar Jyeshtha Nagrik Sanskrutik Mahotsav
नागपूर : प्रसिद्ध कवी- गीतकार- संगीतकार जोडी सलिल कुलकर्णी आणि संदीप खरे यांनी आपल्या सुरेल शब्द आणि मधुर संगीताच्या जादूने आज ( दि. १५) मंत्रमुग्ध केले. लहानग्यांना तालावर डोलायला भाग पाडले, तर ज्येष्ठांच्या मनात आठवणींची हळवी लहर जागवली. प्रत्येकाच्या आयुष्यावर टिपण्णी करणाऱ्या ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाने रसिकांना भावविश्वाचा सुरेल, हृदयस्पर्शी प्रवास घडवला.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून आयोजित दोन दिवसीय महोत्सवाचा कविवर्य सुरेश भट सभागृहात समारोप झाला.
प्रारंभी अभिनेत्री, लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या निशिगंधा वाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्ताजी मेघे होते तर उद्योजक निखिल गडकरी, ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष अशोक मानकर, उपाध्यक्ष प्रा. अनिल सोले, सचिव डॉ. राजू मिश्रा, अविनाश घुशे, डॉ. संजय उगेमुगे, डॉ. दीपक खिरवडकर, नानासाहेब समर्थ, प्रतापसिंह चव्हाण, प्रभाकर येवले यांची मंचावर उपस्थित होते.
सलील व संदीप जोडीने बा.भ. बोरकर, सुरेश भट, आरती प्रभू, मंगेश तेंडुलकर यांच्यासह स्वत:च्याही काही कविता सादर केल्या. त्यांना अनय गाडगीळ, आदित्य आठवले आणि अभय इंगळे यांची उत्तम साथ लाभली.
नवीन काही लिहिले की कुठे ऐकवावे, असा जेव्हा विचार येतो तेव्हा इतर मोजक्या शहरांमध्ये नागपूरचेही नाव असते, असे सांगताना संदीप खरे यांनी दमलेल्या बाबाची कहाणी’ हे अत्यंत लोकप्रिय ठरलेले गीत नागपुरातच सुचल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे लाईव्ह प्रसारण बघत असलेल्या केंद्रीय नितीन गडकरी यांच्या आग्रहावरून त्यांनी हे गीत सादर केले. ‘नसतेस घरी तू जेव्हा’ या भावगीताने सभागृहात हळवे वातावरण निर्माण केले. लहानग्यांच्या आग्रहाखातर सलील व संदीप जोडीने ‘अगंबाई ढगंबाई’ सादर करताच मुलांमध्ये उत्साह संचारला.
या गाण्यावर नृत्य सादर करून त्यांनी दाद दिली तर ‘काळी माती निळं पाणी’ या गीताच्या ठेक्यावर ज्येष्ठांना त्यांनी नृत्य करायला भाग पाडले. ज्या घरात आजी-आजोबा असतात त्या घरात संस्कार असतात, भाषा आणि अक्षर चांगले असतात, या शब्दांतून कुटुंबव्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यांनी सादर केलेल्या आजी-आजोबांवरील ‘जीवंत आजी’ या कवितेने रसिकांचे डोळे पाणावले.
प्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या निशिगंधा वाड यांची सांस्कृतिक महोत्सवातील उपस्थिती जणू ‘निशिगंधा’च्या सुवासासारखी सभागृहात दरवळली. “आनंदाने जगा आणि मनामध्ये आनंदाची एक छोटी कुपी साठवून ठेवा,” असा सकारात्मक संदेश देत त्यांनी उपस्थितांच्या मनात ‘निशि’गंधाचा दरवळ रुजवला.