Nagpur Bus fire
नागपूर : गोंदिया जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सोमवारी रात्री ही भीषण घटना घडली. रायपूरहून नागपूरच्या दिशेने निघालेली कांकेर ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक CG 04 NA 7776) रात्री १० च्या सुमारास सौंदड रेल्वे फाटकाजवळ अचानक पेटली. मात्र, प्रसंगावधान राखत बसचालकाने बस थांबवत सर्व प्रवाशांना वेळेत बाहेर काढल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. या बसमध्ये एकूण २५ ते ३० प्रवासी प्रवास करत होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाल्या मात्र, तोपर्यंत बस पूर्णतः जळून खाक झाली होती. सुदैवाने, सर्व प्रवासी सुखरूप बचावले.
गेल्या काही दिवसात सुरक्षित समजल्या जाणाऱ्या नामांकित खासगी ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू आहे असेच दुर्दैवाने म्हणावे लागेल. गंभीर अपघातांवर पांघरूण घातले जात असल्याने रोज आपले कुटुंबीय, नातेवाईक त्यांची मुले रोजगारासाठी पुन्हा जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत.
24 मार्च रोजी यवतमाळ जिल्ह्यात कोल्हापूर- नागपूर (एम एच 40/ सीएम 5035) सैनी ट्रॅव्हल्सच्या भीषण अपघातात चालकासह 35 प्रवासी गंभीर जखमी झाले. उद्या 24 मार्च रोजी या अपघाताला एक महिना होत आहे. आधी यवतमाळ शासकीय रुग्णालय व नंतर आपल्या खर्चाने ठिकठिकाणी खासगी रुग्णालयात जखमी उपचार घेत आहेत. मात्र अद्यापही ना शासन, प्रशासन ना सैनी व्यवस्थापन कुणीही या जखमींच्या उपचाराची दखल घेतलेली नाही. यवतमाळ ग्रामीण पोलिसांनीही औपचारिकता म्हणून गुन्हा दाखल केला परंतु कुठलेही वाहन समोर नसताना हा अपघात कसा झाला, याची चौकशी केलेली नाही. गाडीत दोन ड्रायव्हर असताना चालकाच्या झोपेच्या डुलकीमुळे प्रवाशांच्या जीवाशी अकारण खेळ झाला. कुणी परीक्षा देण्यासाठी तर कुणी इतर आवश्यक कामासाठी प्रवास करीत होते. केवळ कुणाचा मृत्यू झाला नाही म्हणून मदत नाही अशा भावनेतून असंवेदनशील प्रशासन वागते का?
कॅबिनेट मंत्री अशोक उईके, संजय राठोड असे दोन मंत्री या जिल्ह्यातील असताना इतक्या गंभीर अपघाताची ना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ना राज्य सरकारने दखल घेतली, असा संताप या अपघातातील गंभीर जखमी व त्यांचे नातेवाईक व्यक्त करीत आहेत. यानंतर लागलीच यवतमाळजवळ असलेल्या उमर्डा घाटात पुणे - चंद्रपूर ही डीएनआर ट्रॅव्हल्सची बस (एम 34 बीजी 0077) 29 प्रवासी घेऊन उलटली. सुदैवाने ती भक्कम झाडांच्या कडेला अडली म्हणून अनर्थ टळला. 12 प्रवासी जखमी झाले. त्यापूर्वी जबलपूर रोडवर तसेच बुलडाणा जिल्ह्यात ट्रॅव्हल्सच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसात अशा एक ना अनेक घटनांनी ट्रॅव्हल्सच्या सुरक्षित प्रवासावर, पोलिस,परिवहन विभागाच्या कार्यक्षमतेवर आणि प्रशासन राज्य शासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.