नागपूर

Nagpur News: कातलाबोडी येथील गोपालकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू: अनिल देशमुखांची जंगलात ५ किमी पायपीट

अविनाश सुतार

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : चराईसाठी जंगलात गुरे घेऊन गेलेले गोपालक अमोल अंबादास मुंगभाते यांच्या शोधासाठी‌ गावकऱ्यांनी घनदाट जंगल पिंजून काढले. मात्र, कोंढालीपासून १८ किलोमीटर दूर कातलाबोडी जंगलात गोपालकावर वाघाने हल्ला केल्यामुळे गोपालक अमोलचा मृतदेह जंगलात आढळून आला. (Nagpur News)

कोंढाळी वनपरिक्षेत्रातील ही घटना असून २२ वर्षीय गोपालक अमोल अंबादास मुंगभाते १८ नोव्हेंबरच्या सकाळी ८ वाजता नेहमीप्रमाणे गुरे चरायला घेऊन गेला. दररोज सायंकाळी ६ वाजता परतणारे गुरे शनिवारी दुपारी ४.३० वाजताच परत आली. मात्र, गोपलाक अमोल परतला नसल्याने गावकऱ्यांनी अमोलचा शोध घेण्यासाठी‌ सायंकाळी पाच वाजता जंगल गाठले व घटनेची माहिती कोंढाळी वनाधिकाऱ्यांना दिली. (Nagpur News)

घनदाट जंगलात अमोलचा शोध सुरू झाला. रात्री १० ते ११ चे दरम्यान या जंगलातील भडभड्या नाल्याच्या बाजूला अमोलचा जेवणाचा डबा, चप्पल, तसेच काठी, कुऱ्हाड एका झाडाखाली आढळून आली. त्या आधारे गावकऱ्यांनी रात्रीच्या वेळी त्या परिसरात अमोलचा शोध घेणे सुरू केले. यात काही अंतरावर अमोलचा पँट, रक्ताचे डाग, केस, व त्याला वाघ फरफटत नेत असताना जागोजागी रक्ताचे डाग व हाताचे बोट पडलेले दिसले. या चिन्हांचे आधारावर मागोवा घेत घेत जंगलाच्या आतमध्ये अमोलचा मृतदेह रात्री ‌११च्या दरम्यान दिसून आला.

वनविभाग अधिकारी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतल्यावर गावकऱ्यांनी मृतदेह शवविचछेदनासाठी न जाऊ ‌देता रोखून धरला. याप्रसंगी गोपालक अमोलच्या कुटुंबियांना आर्थिक मोबदला, व मोठ्या भावास नोकरी, तसेच वाघाला जेरबंद करण्याची मागणी संतप्त ग्रामस्थांनी लावून धरली.

दरम्यान, या घटनेची माहिती माजी गृहमंत्री व या भागाचे आमदार‌ अनिल देशमुख यांना मिळाली. ते कातलाबोडीत पोहचले व गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गावकऱ्यांचा संताप शांत करण्यासाठी वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपवन संरक्षक डॉ. भारतसिंग हाडा यांच्यासोबत चर्चा करून मृताच्या परिवाराला शासन नियमानुसार २५ लाख रुपयांची मदत देण्याची सूचना केली. ५ लाखांचा धनादेश २० नोव्हेंबरला मृत अमोलचे कुटुंबियांना देण्यात येणार असून २० लाख रुपयांचा धनादेश मृताच्या वडिलांच्या नावाने बँकेत जमा करण्याची कबुली वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी डॉ. भारतसिग हाडा यांनी आमदार अनिल देशमुख व उपस्थित गावकरी यांच्यासमक्ष दिली.

तसेच मृताचे मोठ्या भावाला वनविभागात रोजंदारी स्वरूपाची नोकरी देण्याचे लेखी स्वरूपात आश्वासन दिले. यानंतरच गावकऱ्यांनी अमोलचा मृतदेह शव विच्छेदनासाठी वनविभागाच्या ताब्यात दिला.

कोंढाळी वनपरिक्षेत्रात वाघाकडून मानवी हल्याची पहिलीच घटना असून कोंढाळी वन परिक्षेत्रातील उपवन मेंढेपठार, कोंढाळी, घुबडी, व अहमदनगर या उप वनविभालगतच्या बोर अभयारण्यातील वाघ, बिबट यांचा या भागात नेहमीच वावर आहे. यात एका वर्षात ८२ जनावरांना लक्ष्य केले आहे. मानवी हल्याची ही पहिलीच घटना असल्याची माहिती कोंढाळीचे ‌वन परिक्षेत्र अधिकारी निशिकांत कापगते यांनी दिली.

१९६२ नंतर कातलाबोडी‌ भागात प्रथमच वाघाने गोपालकावर हल्या चढवल्याची माहिती वन्यजीव मानव सदस्य उधमसिंग यादव यांनी दिली. यावेळी सरपंच अर्चना खोब्रागडे, नितेश कोवे, धनराज भड, चंद्रशेखर चिखले, जयंत टालाटुले, बंडू राठोड नितेश कोवे, वन्य जीव संरक्षण मानद सदस्य उधमसिंह यादव हजर होते.

Nagpur News अनिल देशमुख यांनी घनदाट जंगलात पाच किलोमीटरची पायपीट

आमदार अनिल देशमुख यांनी घनदाट जंगलात पाच किलोमीटरची पायपीट करीत घटनास्थळ गाठले.इतक्या रात्री घनदाट जंगलात मृतक अमोलचा मृतदेह गावकऱ्यांनी शोधून काढले या गावकऱ्यांच्या धाडसाबाबत आमदार अनिल देशमुख यांनी आभार मानले.

वनचौक्या बंद

या भागाचे आमदार अनिल देशमुख घटनास्थळी कुटुंबीयांचे सांत्वन करीत असताना गावातील युवकांनी समस्यांचा पाढा मांडला. यात उपवनात वनचौक्या बंद असून वन कर्मचाऱ्यांची संख्या फारच कमी असल्याचे सांगितले. उपवनसंरक्षक हाडा यांनी सांगितले की, वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असून जंगलात पिंजरे लावण्यात आले आहेत. ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

हेही वाचा 

SCROLL FOR NEXT