नागपूर : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसची ७ मते फुटल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता वर्तवली जात आहे. गेले अनेक दिवस काँग्रेस फुटीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. आता हे फुटलेले आमदार महायुतीच्या वाटेवर असल्याच्या चर्चा जोरात आहेत.
काँग्रेसच्या यादीत कागदोपत्री असलेले हे आमदार मात्र मनाने तिकडेच असल्याचे कळते. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत ते महायुतीचे उमेदवार असतील असेही बोलले जाते. दुसरीकडे या पार्श्वभूमीवर लवकरच काँग्रेसमधून या आमदारांवर निलंबनाची कारवाई अटळ असल्याचेही बोलले जात आहे. "ज्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढायची त्यांच्याच धोरणाविरोधात मतदान करायचे ही त्यांची पक्षनिष्ठा नसल्याचेच द्योतक आहे. गेल्या विधान परिषद निवडणुकीतच या सर्व संबंधितांवर कडक कारवाई केली असती तर ही वेळ आलीच नसती," असे मत नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी आज नागपुरात 'दैनिक पुढारी'शी बोलताना व्यक्त केले.
या निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या विधान परिषद निवडणुकीची पुनरावृत्ती झाली आहे. गेल्या वेळी काँग्रेस हायकमांडने दिलेले उमेदवार चंद्रकांत हांडोरे यांच्या विरोधात मतदान केल्याने त्यांचा पराभव झाला तेच हे सात आमदार यावेळी देखील महाविकास आघाडीच्या विरोधात गेले आहेत. यामुळे आता तरी तातडीने या सर्वांवर ठोस कारवाई पक्षाने करावी अशी मागणी या निमित्ताने ठाकरे यांच्यासोबतच इतर काँग्रेसचे आमदारांकडून पुढे आली आहे. नागपूरचे विधानपरिषद सदस्य अभिजित वंजारी, सतेज पाटील यांच्यावर या निवडणुकीत महत्वाची जबाबदारी होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या संदर्भातील आपला अहवाल हाय कमांडकडे सोपविण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यामुळे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येत असताना काँग्रेस या सर्व पक्षनिष्ठा न पाळणाऱ्यांवर कडक कारवाई करणार का, हे आमदार महायुतीत जाणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.