Finally, Bageshwar Dham's Dhirendra Shastri Apologizes!
नागपूर : पुढारी वृत्तसेवा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानप्रकरणी राज्यभरात वादळ निर्माण झाल्यानंतर अखेर बागेश्वरधामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी आज मी हृदयापासून क्षमाप्रार्थी आहे या शब्दात माफी मागितली आहे. नागपुरातील रेशीमबागेत आजपासून आयोजित श्रीराम कथा सुरू होण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.
शिवाजी महाराज हे प्रेरणास्थान असून स्वप्नातही त्यांचा अवमान मी सहन करू शकत नाही. संत, महापुरुषांविषयीची ते कसे समर्पित होते. त्यांची आदर भावना कशी होती हे सांगण्याचा आपला प्रयत्न होता. यात कुठेही अवमान नव्हता. मात्र जाणीवपूर्वक आपल्या वक्तव्याचा अनर्थ केला गेला. सोशल मीडियावरून बदनाम करण्यात आले. मुळात ज्यांच्या हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेतून आपण हिंदुराष्ट्राची कल्पना पुढे नेली. आज प्रत्येक सनातनी जिवंत आहे तो छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे असेही ते म्हणाले.
आपण आपसात भांडत राहिलो तर इतराना संधी मिळेल याकडे लक्ष वेधले. यासोबतच चार मुले जन्माला घाला, एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या, या विधानापासून देखील त्यांनी घुमजाव केले आहे. एक मुलगा राष्ट्रकार्य करण्यासाठी, राष्ट्रसेवेसाठी द्या, सैन्यात, पोलिसात द्या अशी आपली भावना असल्याचे ते म्हणाले.
लव्ह जिहाद रोखण्याची गरज व्यक्त करताना युवापिढीने रिलच्या भानगडीत रियल जगणे सोडू नये, मुलींनी रिल, इंस्टाग्रामच्या नादात आपले सर्वस्व गमावू नये, काहीही व्हा पण नाचणारी होऊ नका, असेही सांगितले. लोकसंख्या नियंत्रण हवेच पण एकाचे 30 तर दुसरीकडे दोन मुले असे नको, मी चार मुलांबद्दल बोललो तर विरोध होतो. देशात समान कायदा असावा यावर भर दिला.
हिंदुराष्ट्रासाठी दोन पदयात्रा काढल्या आता तिसरी रथयात्रा काढणार असल्याचे सांगितले. आपण राजकारणावर बोलत नाही, नितीधर्मावर बोलतो. जो देशहित, सनातन धर्माच्या हितासाठी काम करतो त्यानेच देशावर राज्य केले पाहिजे असे सांगितले. दोन दिवस राज्यभरात वादळ निर्माण झाल्यानंतर आज बोलताना त्यांनी काही लोकांचे इतरांची बदनामी हेच टार्गेट असते याकडे लक्ष वेधले.