Vijay Wadettiwar vs Maharashtra Government
नागपूर : शेतकऱ्यांसाठी ठोस उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेले महायुती सरकार मात्र न केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात आघाडीवर असल्याची टीका काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. अन्नदात्याला मदत करायची असेल तर ती सन्मानाने द्यावी, हातचे राखून नव्हे. राज्याच्या तिजोरीवर पहिला हक्क शेतकऱ्यांचाच असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
लातूर जिल्ह्यातील एका शेतकरी दांपत्याने स्वतः नांगर ओढत शेती केल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. या घटनेने सरकारला लाज वाटायला हवी होती; मात्र सरकारने त्या दांपत्याला एक बैल देऊन त्याचे मोठे प्रसिद्धीकरण केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. शेतकऱ्यांप्रती संवेदनशील असल्याचा आव आणत फोटोसेशन आणि जनसंपर्क मोहीम राबविण्यात आली, मात्र प्रत्यक्षात दिलेला बैल आजारी निघाल्याने शेतकरी दांपत्यावर त्याच्या उपचारांचा अतिरिक्त खर्च करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी नमूद केले.
शेतकऱ्यांना शाश्वत आणि परिणामकारक मदत देण्याऐवजी केवळ जाहिरातबाजी व दिखाव्यासाठी मदतीचा आव आणणे ही भाजपची कार्यपद्धती असल्याचे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. शेतकरी कर्जमाफीबाबतही सरकारने असाच दिखाऊपणा केल्याचा आरोप करत, या योजनेचा प्रत्यक्ष लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही. उलट उर्वरित कर्ज फेडण्यासाठी त्यांच्यावर दबाव वाढल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सरकारची अनास्था पुन्हा एकदा समोर आली असून, केवळ प्रसिद्धीच्या मोहापेक्षा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष दिलासा देणाऱ्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.