Devendra Fadnavis vs Eknath Shinde
नागपूर : कुठल्याही योजनांचे श्रेय कुणी व्यक्तिगत घेऊ नये. सरकारच्या योजना या सरकारच्याच असतात कुठल्याही एका पक्षाच्या नाहीत. तिन्ही पक्षांच्या त्या योजना आहेत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचेही नाव न घेता सहयोगी घटक पक्षांच्या नेत्यांना खडे बोल सुनावले. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात विविध योजना मार्गी लागल्या असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूर्व विदर्भातील दौऱ्यात काल आवर्जून सांगितले. या पार्श्वभूमीवर त्यांच्या या विधानाला महत्त्व आले आहे.
नागपूर जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असता ते माध्यमांशी उमरेड येथे जाहीर सभेनंतर बोलत होते.
बॉम्बेचे मुंबई करण्यात सर्वात मोठा वाटा भाजप नेते रामभाऊ नाईक यांचा आहे. आमच्यासाठी ते कायम मुंबईच आहे. बॉम्बेच्या काही जुन्या खुणा मिटल्याच पाहिजे या शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईचे समर्थन करीत विरोधकांना खडसावले. मी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मानव संसाधन विकास मंत्री यांना पत्र लिहून आयआयटी बॉम्बेचे मुंबई करा, अशी विनंती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र हे सर्व होत असताना काही लोक सोयीस्करपणे आपण ज्या शाळेत मुलांना शिकवले त्याचे नावही बदलले पाहिजे हे सोयीस्करपणे विसरतात. मात्र, मला त्याबद्दल काहीही बोलायचे नाही, असा टोला देखील त्यांनी विरोधकांना लगावला.
अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा घ्या, अन्यथा मी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना भेटणार, असा इशारा दिला. या संदर्भात त्या काय बोलल्या याविषयी मला माहिती नाही, असे फडणवीस म्हणाले. महायुतीच्या वतीने स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याच्या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आम्ही सरकारमध्ये एकत्रितच आहोत. मात्र, नगर पालिका निवडणुकीत स्थानिक पातळीवर काही ठिकाणी वेगवेगळे लढत आहोत.
दरम्यान, या निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेते अद्यापही प्रचारात दिसत नाहीत या संदर्भात बोलताना हे प्रचारात का नाहीत हे त्यांना विचारा, मुळात जनतेमध्ये जाऊन मतांचा जोगवा मागणे चुकीचे नाही. घरी बसून राजकारण करता येत नाही. लोक आपल्याला मतदान करतीलच असे कुणालाही वाटत असेल तर ते अयोग्य आहे. आमच्या परीने आम्ही अधिकाधिक जनतेत जाण्याचा प्रयत्न करीत आहोत. ते का जात नाहीत त्यांच्याबद्दल आम्ही बोलणार नाही.
तर दुसरीकडे महायुतीत परस्परांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना प्रवेश द्यायचा नाही असे ठरले असताना शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात पुन्हा प्रवेश घेतला या संदर्भात छेडले असता ते शिवसेनेचे नाहीत मला त्याविषयी माहिती नाही असा दावा फडणवीस यांनी केला.