नागपूर, पुढारी वृत्तसेवा : हरियाणातील निकालाने काँग्रेससह विरोधक चांगलेच तोंडघशी पडले आहेत. फेक नॅरेटिव्ह फार काळ चालत नाही, तो आता संपला आहे. देशातील जनतेचा मूड सांगणारा, जनता भाजपच्या पाठीशी असल्याचे दाखविणारा हा निकाल आहे, असा टोला उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.९) विरोधकांना लगावला. नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आज सुमारे 7600 कोटींच्या राज्यातील विविध योजना, प्रकल्पाचे लोकार्पण भूमिपूजन उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.
हरियाणात भाजपचा पराभव होईल, या फाजील आत्मविश्वासात असलेल्या शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांना या निकालाने चांगलेच तोंडघशी पडावे लागले. किंबहुना आजवर 'हम साथ साथ है' म्हणणारे देखील 'हम आपके है कौन' असे बोलू लागले आहेत, असा टोला त्यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना लगावला.
राऊत यांनी हरियाणात काँग्रेस एकट्याने लढल्यामुळे ही वेळ आली आहे. इंडिया आघाडीला विश्वासात घेतले नाही. जिथे काँग्रेस कमकुवत असते, तिथे प्रादेशिक पक्षांना सोबत घेते, असा आरोप केला. त्याला फडणवीस यांनी उत्तर दिले. महायुतीच्या जागा वाटपाचा पेपर 80 टक्के सुटला आहे. 20 टक्के लवकरच सुटेल, असे एका प्रश्नाचे उत्तरात त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयानेच योग्य तो निकाल दिल्यामुळे विमानतळाच्या पुनर्विकासाचा, विदर्भ विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. एकप्रकारे आपल्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा हा दिवस आहे. दरम्यान, याच काळात 8 मेडिकल कॉलेजेसना आपण मंजुरी दिली होती. यातील पाच विदर्भातील असल्याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.