पुढारी ऑनलाईन डेस्क : मंत्रिमंडळ विस्तारात (Maharashtra cabinet expansion) स्थान न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज झाले आहेत. तर दुसरीकडे आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर मौन बाळगत कुणालाही भेटणे टाळले आहे. ते काल सोमवारपासून गेल्या २४ तासांपासून नॉट रिचेबल असल्याचे वृत्त 'पुढारी न्यूज'ने दिले आहे. काल सोमवारी अजित पवार सभागृहात उपस्थित नव्हते. त्यामुळे ते नॉट रिचेबल असल्याच्या वृत्ताला पुष्टी मिळत आहे. ते दिल्लीत असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी पक्षाकडून अजित पवार नॉट रिचेबल नसल्याचे सांगण्यात आले आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी म्हटले आहे की, अजित पवार कुठेही नॉट रिचेबल झालेले नाहीत. ते त्यांचे नियमित कामकाज करत आहेत. ते नागपुरातील त्यांच्या निवासस्थानीच आहेत. त्यांनी काल पदाधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या.
मंत्रिमंडळातील खातेवाटप संदर्भात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी अजित पवार दिल्लीत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे ते काल आणि आज कोणालाही भेटले नाही अथवा विधिमंडळातही आले नाहीत. महिला व बालविकास विभाग आणि अर्थ खात्याचा पेच असल्याने अजित पवार दिल्लीत असल्याचे समजते. आदिती तटकरे यांच्याकडे असलेल्या महिला आणि बाल विकास विभागासाठी पंकजा मुंडे आग्रही आहेत. तर अर्थ खात्यासाठी भाजप आग्रही आहे. अजित पवारांना सार्वजनिक बांधकाम विभाग देण्याचा भाजपचा प्रस्ताव आहे. पण, महिला व बालविकास विभाग आणि अर्थ खाते राष्ट्रवादीला मिळावे यासाठी अजित पवार आग्रही आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी ते कालपासून दिल्लीत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळ विस्तार होवूनदेखील अजूनही खाते वाटप जाहीर झाले नसल्याची चर्चा सुरु आहे.
महायुतीच्या सत्तेत मंत्रिपदावरून डावलले गेल्यामुळे भुजबळ नाराज आहेत. सोमवारी नागपूरमध्ये त्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखविली. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना भुजबळ यांनी आपल्या खास शैलीत, 'जहाँ नहीं चैना, वहाँ नहीं रहना' असे सूचक विधान केले होते. जरांगेंना अंगावर घेण्याचे बक्षीस मला मिळाले. नव्यांना संधी देण्यासाठी ज्येष्ठांना डावलले जातेय. मी सामान्य कार्यकर्ता आहे. मला डावलले काय आणि फेकले काय, मला काही फरक फडत नाही. अशी मंत्रिपदे किती वेळा आली आणि गेली, मी कधीही संपलेलो नाही. पण मी नाराज आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली. ते सोमवारी (दि. १६) नागपूर येथील हिवाळी अधिवेशन सोडून नाशिकमध्ये परतले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील या जुन्याजाणत्या नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलेले नाही. त्यांनी नव्या चेहर्यांना संधी देऊन पक्षाचा चेहरा बदलण्याचे संकेत दिले आहेत. उत्तर महाराष्ट्रात विशेषत: नाशिक जिल्ह्यातून पवार यांनी माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ या दोघांना संधी देऊन या भागात पक्षांचे बस्तान बसविण्याचा प्रयत्न चालवला आहे. शरद पवार गटाचा बालेकिल्ला मानला जाणार्या पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित करत अजित पवार यांनी या भागातून हसन मुश्रीफ, दत्तात्रय भरणे, मकरंद जाधव-पाटील यांना संधी दिली आहे.