नागपूर, राजेंद्र उट्टलवार : मागील काही दिवस ईडी, सीबीआय वरून सुरू असलेले आजी-माजी गृहमंत्र्यांचे आरोप आता थेट आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विकास कामे रोखल्याच्या आरोपापर्यंत आले आहेत. केवळ विशिष्ट मतदारसंघातच कामगार किट वाटप केले जात असल्याचे आरोपावरून सलील देशमुख यांनी न्यायालयात धाव घेतली व मोर्चा काढला. आता उद्या कामगार विभागाला स्पष्टीकरण देण्यास न्यायालयाने बजावले आहे. दुसरीकडे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आता राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मतदारसंघातील कामे रोखल्याचा आरोप करीत जिल्हाधिकारी कार्यालयापुढे उद्या आंदोलनाचा इशारा दिला आहे.
आपल्या विधानसभा मतदारसंघात काटोल नरखेडची विकास कामे देवेंद्र फडणवीस यांनी रोखली असा आरोप अनिल देशमुख यांनी केला असून अनेक विकासकामांच्या आदेशावर नागपूरचे जिल्हाधिकारी हे सही करण्यास तयार नाहीत. त्यांच्यावर दबाव असून राज्याचे उपमुख्यमंत्री व नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणविस यांनी सही करण्यास मनाई केली आहे. ही सर्व विकास कामे सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीसाठी असून अनिल देशमुखांच्या घरची नाहीत असेही ठणकावले आहे. आदेशावर सही झाली नाही तर शुक्रवार दि. 11 ऑक्टोंबरला सकाळी 10 वाजता मी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याची माहिती माजी गृहमंत्री आमदार अनिल देशमुख यांनी दिली.
काटोल व नरखेड तालुक्यातील अनेक विकास कामांच्या फाईल गेल्या वर्षभरापासुन सहीकरीता प्रलंबित आहेत. यात प्रामुख्याने पांधन रस्ते, खनीकर्म विकास निधी, जनसुविधा, नागरीसुविधा, 3054, तीर्थक्षेत्र, पर्यटन विकास निधी, अनेक प्रकल्पाच्या भुसंपादन प्रकरणे यासह इतर विभागाच्या कोटयवधी निधीच्या फाईल या जिल्हाधिकारी यांच्याकडे वर्षभरापासुन मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचा आरोप देशमुख यांनी केला आहे.