हिंगोली, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील इसापूर, येलदरी व सिद्धेश्वर धरण निर्माण करून ६५ वर्षे उलटली तरीही अद्यापपर्यंत विस्थापित झालेल्या १५ हजारांपेक्षा जास्त कुटुंबांना न्याय मिळाला नाही आणि देशोधडीला लागलेल्या हजारो धरणग्रस्त कुटुंबांचा संघर्ष चालू आहे. धरणग्रस्त विकास संघर्ष समिती हिंगोली जिल्ह्याच्या वतीने एक वर्षापूर्वी गांधी जयंती दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ५ हजारांच्यावर धरणग्रस्तांची हक्क परिषद घेऊन जिल्हाधिकारी हिंगोली यांना मागण्यांचे निवेदन दिले होते. परंतु प्रशासनाने धरणग्रस्तांच्या मागण्यांच्या अनुषंगाने कोणतीही कार्यवाही मागील एक वर्षापासून केली नाही. त्यामुळे तिन्ही प्रकल्पातील धरणग्रस्त आंदोलकांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयसमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
बुडीत क्षेत्रातील प्रत्येक गावांचे प्रत्येक कुटुंबासह पुनर्वसन करावे, धरणग्रस्त कुटुंबांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र वितरित करावे, धरणग्रस्तांना शासकीय नोकरी देऊन पदोन्नतीमध्ये प्राधान्य द्यावे, इसापूर, येलदरी, सिद्धेश्वर धरणग्रस्तांना आर्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक न्याय मिळवण्यासाठी हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली आयोग गठीत करावा, इसापूर धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्यासंबंधी ठरवण्यात आलेल्या धोरणाची माहिती जाहीर करावी, तिन्ही प्रकल्पातील पुनर्वसित गावांना महसुली दर्जा द्यावा, धरणग्रस्तांच्या वारसांची विशेष नोकर भरती करावी, धरणग्रस्त बाधित कुटुंबांची शासकीय नोकर भरती करताना स्वजिल्ह्यातील धरणग्रस्तांना प्राधान्य देण्यात यावे,
जुन्या धरणग्रस्तांना नवीन जमीन भूसंपादन कायदा २०१३ ची अंमलबजावणी करावी, धरणग्रस्तांचे सर्व शासकीय दस्तावेज अद्ययावत करून त्याची आधुनिक तांत्रिक पद्धतीने जपणूक करावी, धरणग्रस्तांना शासकीय अवॉर्ड नक्कल वितरित करताना ते प्रमाणित करून द्यावी आदी मागण्यांचा समावेश आहे. मागण्या त्वरित मान्य कराव्यात अन्यथा धरणग्रस्तांच्या वतीने हिंगोली जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि निर्माण होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेला सर्वस्वी आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी अॅड. सचिन नाईक, धरणग्रस्त संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष अॅड. रवी शिंदे, वामनराव पोले, उद्धव हराळ, अॅड. प्रदीप नाईक, भाऊराव श्रीरामे, भारतराव चिलगर, भारत जाधव, गोविंदराव मस्के, योगेश हुलगुंडे, गजानन वाघमारे, विठ्ठल मस्के, सखाराम इंगोले, विकास थिटे, बाजीराव गडदे, मुकिंदा कांबळे, गजानन हाके, डॉ. सतीश पाचपुते, डॉ. शारदा पाचपुते, बाबुराव नाईक, अमृतराव चिलगर, मोहन चिलगर शिवाजी फुले, अतुल कवठेकर, पंकज होडबे, भास्करराव पोले यांच्यासह मोठ्या संख्येने धरणग्रस्त बांधव उपस्थित होते.