नागपूर : अलीकडेच ठाकरे शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याचा आणि जे व्हायचे ते होऊ द्या, एकदा आपले बळ अजमावून बघण्याचा इरादा नागपुरात जाहीर केला होता. त्यानंतर आता काँग्रेस देखील वेळ पडल्यास स्वबळाच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे एका जागेसाठी 30 इच्छुक उमेदवार असल्याचा दावा केला जात आहे.
सोमवारी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील राऊत यांचे वक्तव्य बेदखल करीत या निवडणुकीला वेळ आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही आमचे बघू असा पवित्रा घेतला. 151 उमेदवारांसह आमची सर्व तयारी आहे. 2014 नंतर आमची शक्ती वाढल्याचा दावा शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांनी मंगळवारी केला आहे.
ठाकरे म्हणाले की, महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडे 1500 लोकांनी इच्छुक म्हणून अर्ज केले आहेत. आमची तयारी सर्व प्रभागात लढण्यासाठी आहे. शेवटी महाविकास आघाडीचा निर्णय जसा असेल, त्या पद्धतीने निर्णय होईल. मात्र, सर्व प्रभागात उमेदवार असल्याने आमची तयारी आहे. शहराचा विचार करता काँग्रेसचे मताधिक्य 2014 नंतर वाढलेले आहे. सर्व जागेवर लढलो. तर अधिक चांगले अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र, शेवटी हा निर्णय वरिष्ठ पातळीवर, महाविकास आघाडी म्हणूनच घेतला जाईल. तूर्त 151 जागेवर आम्ही तयारी केली आहे.
विशेष म्हणजे या 151 जागेसाठी पंधराशे उमेदवार आहेत. इतर पक्षांनीही तशी संधी दिल्यास पक्ष वाढीस मदत होईल. सत्ता राज्यात कोणाचीही असो काँग्रेसचे मताधिक्य कमी होऊ देणार नाही, असा विश्वास ठाकरे यांनी बोलून दाखविला.
दरम्यान, सहयोगी प्रत्येक पक्षाने आपापले किती नगरसेवक यापूर्वी निवडून आलेत. याविषयीचे आकलन करावे, असा सबुरीचा सल्ला देखील ठाकरे यांनी दिला आहे. सक्षम माजी नगरसेवक, जनतेत जाऊन काम करणारे, मनपाशी संबधित विषयाचा अभ्यास असलेले आणि जनतेसाठी धावून जाणाऱ्या उमेदवारांची आम्ही निवड करू, असेही ठाकरे म्हणाले. गेल्यावेळी भाजपला 105 तर काँग्रेसला केवळ 29 जागा मिळाल्या. यातही शेवटपर्यंत गटबाजी सुरूच होती. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्यात भक्कम अशा सत्तेत असलेल्या भाजपशी काँग्रेस एकाकीपणे कशी मुकाबला करणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.