BJP vs Congress
नागपूर : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत जनतेने विकासाच्या बाजूने स्पष्ट कौल दिला असून ममता बॅनर्जी यांच्या कथित दडपशाहीच्या राजकारणाला नाकारले, अशी प्रतिक्रिया महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली.
देशभरातील मतदार आता विकासाभोवती एकवटत असून काँग्रेससह विरोधी पक्षांनी आत्मपरीक्षण करावे, यापासून धडा घ्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बावनकुळे म्हणाले की, बंगालच्या जनतेने विकसित राज्यासाठी मतदान केले आहे. देशात विकासाच्या राजकारणाला पाठिंबा वाढत असून विरोधक मात्र, अजूनही जुन्या विचारातून बाहेर पडताना दिसत नाहीत. महाराष्ट्रातही जनता विकासाच्या बाजूने उभी राहिली आहे. आगामी काळातही विरोधकांना जनतेचा पाठिंबा मिळणार नाही, असा दावा त्यांनी केला.
संघ परिवाराच्या भूमिकेबाबत पश्चिम बंगालमधील विजयामागे दीर्घकालीन संघटनात्मक मेहनत घेण्यात असल्याचे सांगताना बावनकुळे म्हणाले की, हजारो कार्यकर्त्यांनी अनेक वर्ष संघर्ष केला. अनेक कार्यकर्त्यांनी प्राणांची आहुती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, गृहमंत्री अमितजी शाह यांच्या मार्गदर्शनात आणि बूथ स्तरावरील मजबूत व्यवस्थापनामुळे हा विजय शक्य झाला. बंगालमध्ये सुशासन यावे, हीच कार्यकर्त्यांची भावना होती यावर भर दिला.
नरसापूर येथील घटनेबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, संपूर्ण महाराष्ट्र पीडित कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल. पोलिसांकडून आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असून राज्य सरकारही न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध आहे.