नागपूर : शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षकांचा काहीही दोष नाही, उलट ज्या शाळा संचालकांनी पैसे घेतले,फसवणूक करीत बदमाशी केली त्यांची मालमत्ता जप्त केली जाणार असल्याचे संकेत आहेत. या संदर्भात शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याशी चर्चा झाली असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
नियोजन भवन येथे बावनकुळे प्रसार माध्यमांशी बोलत होते. बावनकुळे म्हणाले की, शाळा संचालकांनी शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या आधी त्यांना प्रलोभन देत खोट्या पद्धतीने शालार्थ आय डी तयार केले आणि त्यांची नियुक्ती केली आहे. अनेक शिक्षकांनी तर नोकरीसाठी कर्ज घेतले आहे. मात्र शाळा संचालकांनी गैरव्यवहार केले आहेत. त्यात शिक्षकांचा काहीही दोष नाही. शासन त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्यासोबत चर्चा करून ठोस तोडगा काढला जाईल. उलट ज्या शाळा संचालकांनी बदमाशी केली आहे त्यांची मालमत्ता जप्त केली पाहिजे. या संदर्भात पुन्हा एकदा शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या सोबत चर्चा केली जाईल असेही स्पष्ट केले.
पूरग्रस्त भागात तातडीची मदत
राज्यात विविध ठिकाणी निर्माण झालेल्या पूरस्थितीवर राज्य सरकार सर्वतोपरी लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पूरग्रस्त भागात मदत कार्य सुरू आहे. ज्या भागात रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे, त्या ठिकाणी सर्व यंत्रणा सतर्क आहेत. पंचनामे सुरू असून जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत नुकसान भरपाई देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शिवाय मुंबईतील वॉर रूम मधून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून आवश्यक तातडीची मदत पोहोचवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.