Chandrashekhar Bawankule on Sanjay Raut
नागपूर: भाजप बूथप्रमुखांचे एक लाख व्हॉट्सअॅप ग्रुप पार्टीच्या वॉररुमसोबत जोडलेले आहेत. याबाबत त्यांना कल्पनाही आहे. या माध्यमातून सरकारच्या कल्याणकारी योजना समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत आम्ही पोचवत असतो. पक्षामध्ये कार्यकर्त्यांसोबतचा संवाद याच व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून होतो, असे स्पष्टीकरण अखेर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे.
भंडारा येथील त्यांच्या वक्तव्याने राजकीय वातावरण तापले. भंडारा जिल्ह्यात सर्वांचे मोबाईल फोन, मोबाईल सर्व्हिलन्सवर आहेत, असा इशारा त्यांनी जाहीरपणे दिला होता. यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनीही त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला.
बावनकुळे यांनी आज शुक्रवारी माध्यमांशी बोलताना स्पष्टीकरण दिले. ग्रूपवर आलेल्या कमेंट्स वाचून भूमिका ठरविली जाते. नकारात्मक भावना नष्ट करून सकारात्मकता निर्माण केली जाते. यातून कार्यकर्ते व पार्टी यांच्यातील संवाद अधिक चांगला होतो. महत्वाचे म्हणजे आमच्या पक्षात आम्ही काय करावे, हे ठरविणारे संजय राऊत कोण आहेत? असा प्रश्नही त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, निवडणुकीदरम्यान अनेक निगेटिव्ह - पॉझिटिव्ह बातम्या येत असतात. आमच्या कार्यकर्त्यांच्या कमेंट तपासण्याचे काम आमची यंत्रणा करत असते. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे एक लाख ग्रुप पार्टीने तयार केले आहेत व ते सर्व वॉर रूमसोबत जोडलेले आहेत. ही माहिती सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आहेच. ते संपूर्ण चेक करतो. व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षांवर काय काम केले पाहिजे, काय अडचणी आहेत, ते सोडविण्याचे काम करतो. यावरून संजय राऊत यांना मिरच्या का झोंबल्या? असा प्रति प्रश्नही त्यांनी केला.
भाजपचा प्रयत्न जिथे महायुती होत असेल, त्याठिकाणी केली पाहिजे असा आमचा पहिला जोर महायुतीवर आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन नेत्यांची समिती बनवली आहे. ज्या ठिकाणी दोन कार्यकर्ते तुल्यबळ आहेत; तिथे आपसात लढतील. मात्र, मनभेदाने मतभेद होणार नाही याची काळजी घेतली जाईल. महायुती विधानसभेपेक्षा अधिक ,51 टक्के मतदान घेत संपूर्ण जिल्हा परिषदा, मनपा जिंकेल. एकही जिल्हा परिषद नगरपालिका महाविकास आघाडीला जिंकता येणार नाही असा दावा बावनकुळे यांनी केला.
महायुतीच्या कार्यकर्त्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या आहेत की, महायुतीमध्ये मतभेद आणि मनभेद तयार होणार नाही,असे कुठलाही व्यक्तव्य करायचे नाही. पण एखाद्याला वारंवार सवय पडली, आपली व्यक्तिगत दुश्मनी काढायची आहे, मतदारसंघात स्वतःचा व्यक्तीगत वाद,अस्तिव टिकवण्यासाठी काही लोकy महायुतीच्या लोकांनाच विरोधक समजत आहेत. आपला विरोधक कोण आहे हे महायुतीच्या कार्यकर्त्यांना समजले पाहिजे. आपण सरकारमध्ये काम करतोय, आमच्याकडे असेल किंवा त्यांच्याकडे असेल प्रमुख नेत्यांनी युतीधर्माची आचारसंहिता पाळली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचना भाजप पाळेल. एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आपल्या नेत्यांना सांगतील असेही सांगितले.