नागपूर : विधानसभा निवडणुका तूर्तास दूर असल्याचे दिसत असले. तरी लोकसभा निवडणुकीत विदर्भातील गेल्यावेळी ९ जागा जिंकणाऱ्या भाजपने दहांपैकी सात जागा गमावल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत कुठलीही चूक करायची नाही, कसर सोडायची नाही, आपले सरकार यायलाच हवे, या दिशेने भाजपकडून पावले टाकली जाऊ लागली आहेत. (BJP Maharashtra)
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इतर राज्यातील नेते पदाधिकारी येणार असून रा.स्व.संघाच्या माध्यमातून समन्वयाची भूमिका जबाबदारी सोपविण्यात येत आहे. बुधवारी मध्य प्रदेशातील कॅबिनेट मंत्री ज्येष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांनी नागपुरातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिमसह, पश्चिम आणि दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आढावा घेतला. स्नेहभोजन केले, यावेळी स्थानिक आमदारांसोबतच पदाधिकारी कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केली. (BJP Maharashtra)
2014 मध्ये विदर्भातील 62 पैकी 45 जागांवर भाजपने विजय मिळवला होता. 2019 मध्ये मात्र यात घसरण झाली अलीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीतील आकडेवारी पाहता विधानसभा निवडणुकीत महायुतीची चिंता विविध कारणांनी वाढली आहे. एकीकडे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल, असा अंदाज असला तरी भाजप कुठलीही उणीव ठेवण्यास तयार नाही. पूर्व विदर्भाची जबाबदारी तेलंगणाचे संघटन मंत्री चंद्रशेखर यांना दिली आहे. पश्चिम विदर्भात संघटन मंत्री हितानंद शर्मा हे लक्ष देणार आहेत. (BJP Maharashtra)
याशिवाय दोन जिल्ह्यांसाठी एका मोठ्या नेत्याला प्रभारी म्हणून नेमले जाणार आहे. गडचिरोली -चंद्रपूर साठी माजी मंत्री फगणसिंग कुलस्ते, तर भंडारा, गोंदियासाठी नरोत्तम मिश्रा यांना जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय प्रवासी कार्यकर्ते म्हणून भाजपचे विविध प्रांतातील पदाधिकारी, ज्येष्ठ कार्यकर्ते स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना उपयुक्त मार्गदर्शन करतील. येत्या १ सप्टेंबर पासून हा संघटनात्मक कार्यक्रम सुरू होणार आहे. गणेशोत्सव उत्साहात साजरा होतानाच तरुणाईशी जवळीक साधली जात आहे.
मध्यप्रदेशचे मंत्री कैलास विजय वर्गीय यांच्याकडे नागपुरातील शहर व ग्रामीण अशा 12 जागांची जबाबदारी देण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ते नागपुरात दाखल झाले. आज बुधवारपासून त्यांनी आपल्या या कामाला सुरुवात केली आहे. तीन विधानसभा मतदार संघाचा आढावा घेतला. संघ मुख्यालयात व स्मृती मंदिर परिसराला भेट दिली या सोबतच पवित्र दीक्षाभूमीलाही त्यांनी भेट दिली. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक पदाधिकारी समन्वयक म्हणून भाजप आणि संघ परिवार यामध्ये सेतू म्हणून काम करणार असल्याचे समजते.
एकंदरीत विधानसभा निवडणुकीत गेल्यावेळी बसलेला फटका लक्षात घेता, 105 आमदार येऊनही सत्तेपासून दूर राहावे लागले, हे लक्षात घेता यावेळी भाजप प्रत्येक गोष्टीत अलर्ट मोडवर असल्याचे दिसते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यात भाजपच्या नेतृत्वात सरकार स्थापन व्हावे, आपला मुख्यमंत्री व्हावा, या मुद्द्यावर पुणे येथील बैठकीत भर दिला. हे सर्व पाहता भाजप महायुतीत एकला चलो रे... च्या भूमिकेत कामाला लागल्याचे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा फायदा भाजपला झाला किंवा होणार असला तरीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कितपत फायदा भाजपला सत्ता मिळवून देण्यास कारणीभूत ठरेल, याविषयी भाजपमध्येच साशंकता आहे. त्यामुळेच भाजपने आता स्वबळावर आपला मार्ग चोखाळण्याची तालीम सुरू केलेली दिसते.