मंत्री अशोक उईके यांनी सर्पदंश झालेली विद्यार्थिनी दिपीका मडावी हिची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.  Pudhari
नागपूर

Ashok Uike Visit Snakebite Student | सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनीच्या प्रकृतीची मंत्री अशोक उईके यांच्याकडून विचारपूस

दिपीका मडावीच्या प्रकृतीची केली विचारपूस; आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

पुढारी वृत्तसेवा

Snakebite Student Nagpur GMC

नागपूर : गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनी दिपीका मडावी हिची आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी बुधवारी (दि.१२) नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. उपचारादरम्यान तिच्या प्रकृतीत होत असलेल्या सुधारणेबाबत त्यांनी डॉक्टरांकडून माहिती घेतली तसेच विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशाची गंभीर घटना घडली होती. या घटनेत सर्पदंश झाल्याने चार विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी असलेल्या उपाययोजनांबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

घटनेनंतर प्रकृती गंभीर असलेल्या तीन विद्यार्थिनींना तातडीने हेलिकॉप्टरच्या माध्यमातून नागपूर येथे आणण्यात आले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. त्यापैकी दिपीका मडावी हिची मंत्री अशोक उईके यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. डॉक्टरांकडून तिच्या उपचारांची आणि सध्याच्या प्रकृतीची माहिती घेत त्यांनी आवश्यक उपचाराबाबतही चर्चा केली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि आरोग्य व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दुर्गम आणि आदिवासी भागातील आश्रमशाळांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी निवासी पद्धतीने शिक्षण घेत असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या उपाययोजना असणे गरजेचे आहे. विशेषतः सर्पदंशासारख्या आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध असण्याची आवश्यकता या घटनेतून अधोरेखित झाली आहे.

सर्पदंशाच्या घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनींना वेळेत उपचार मिळावेत यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली. मात्र, चार विद्यार्थिनींच्या मृत्यूमुळे आश्रमशाळांमधील प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य तपासणी, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

मंत्री अशोक उईके यांच्या भेटीमुळे उपचार घेत असलेल्या विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबीयांना मानसिक आधार मिळाला. दरम्यान, या गंभीर घटनेनंतर आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी पुढे आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT