नागपूर, पुढारी वृत्तसेवा : आर्थिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात कार्य करणा-या मनी बी इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने ‘अमृतकाल : विकसित भारत – 2047’ या तीन दिवसीय गुंतवणूकदार प्रशिक्षण परिषदेचे आयोजन 1, 2 व 8 फेब्रुवारी दरम्यान करण्यात आले आहे. 1 फेब्रुवारी रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विश्लेषण करतील, अशी माहिती मनी बीच्या संचालिका शिवानी दाणी-वखरे यांनी गुरुवारी (दि.३०) पत्रकार परिषदेत दिली. (Nagpur Amritkal 2047)
मागील 3 वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या या परिषदेत धोरणकर्ते आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज वक्ते छोट्या गुंतवणूकदारांना अर्थव्यवस्था आणि देशाच्या अमृतकालाकडून भविष्याकडे जात असताना गुंतवणुकीच्या संधी आणि नुकसान याबद्दल मार्गदर्शन केले जाते.
यावर्षीच्या परिषदेचे उद्घाटन शनिवार, 1 फेब्रुवारी रोजी सायंटिफीक सोसायटी लॉन, लक्ष्मीनगर येथे संध्याकाळी 6:30 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला केडिया सिक्युरिटीजचे व्यवस्थापकीय संचालक विजय केडिया, एनएसईचे चिफ बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर श्रीराम कृष्णन यांची उपस्थिती राहतील.
रविवार, 2 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 6:30 वाजता केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, भारत सरकार पियुष गोयल, मॉर्गन स्टॅनली इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक रिधम देसाई व व्हेंचर कॅटॅलिस्ट ग्रुपचे सह-संस्थापक अपूर्व शर्मा यांचे भारतीय अर्थशास्त्र, गुंतवणूक, शेअर बाजार आणि संपत्ती निर्मिती या विषयांवर मार्गदर्शन लाभणार आहे. शनिवार, 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6.30 वाजता या परिषदेचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते समारोप होणार आहे. या कार्यक्रमाला उद्योगपती रमेश दमाणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी आशुतोष वखरे, शैलेश संडेल, श्रवण रोकडे उपस्थित होते.