गोंदिया : जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बी-बियाणे, खते व किटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषि विभागाने 9 भरारी पथक स्थापन केली आहेत. या पथकांमध्ये जिल्ह्यामध्ये 26 गुणनियंत्रण निरीक्षकांचा समावेश आहे. सदर गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषि केंद्राची अचानक तपासणीसाठी धडक मोहिम जिल्ह्यात राबविली जात आहे. या अनुषंगाने राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत जिल्ह्यातील १० कृषीकेंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.
गतमहिन्यात कृषी विभागाच्या गुणनियंत्रण निरीक्षकामार्फत कृषि केंद्राची तपासणी केली. ज्यामध्ये कृषी केंद्राच्या तपासणीवेळी विक्री परवान्यामध्ये उगम प्रमाणपत्राचा समावेश नसणे, नोंदणी प्रमाणपत्र विहित मुदतीत नुतनीकरण न करणे, शिल्लक साठा व दरपत्रक दर्शनी भागात न लावणे, साठा व विक्री रजिस्टर न ठेवणे, रजिस्टरवरील साठा व प्रत्यक्ष साठा न जुळणे, विक्री करत असलेल्या कृषि निविष्ठांचे खरेदी बिल न ठेवणे, ग्राहकास देण्यात येणाऱ्या खरेदी पावतीवर ग्राहकाची सही न घेणे आदी कारणामुळे १० निविष्ठाधारकांचे परवाने निलंबीत करण्यात आलेले आहेत.
कृषीसेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खतांची साठेबाजी व खताची लिंकिंग केली. जादा दराने खत विक्री केल्यास कायद्यांतर्गत कठोर कार्यवाही करण्यात येईल असा इशारा कृषी केंद्रांना दिला आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत परवानाधारक कृषि सेवा केंद्राकडून खते, बियाणे व किटकनाशकाची खरेदी करावी. खरेदी करतांना कृषि सेवा केंद्राकडून निविष्ठा खरेदीची पक्के बिले घ्यावे, त्यावरील नमुद एमआरपी प्रमाणे मालाची खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे, तसेच एमआरपी पेक्षा जादा दराने मालाची विक्री होत असल्यास कृषि विभागाकडे तक्रार करावी. त्याची तात्काळ दखल घेऊन बियाणे कायद्यानुसार संबंधितावर कार्यवाही करण्यात येईल,- अजित आडसुळे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, गोंदिया