शेतकरी न्याय यात्रेमध्ये सहभागी झालेले काँग्रेस पदाधिकारी  Pudhari News Network
गडचिरोली

Congress Shetkari Nyay Yatra | मतांची चोरी करुन सत्तेत आलेलं सरकार शेतकऱ्यांना न्याय कसं देईल? : हर्षवर्धन सपकाळ

पुढारी वृत्तसेवा

Congress Shetkari Nyay Yatra

गडचिरोली : महाराष्ट्रातील सत्तारुढ सरकार हे मतांची चोरी करुन आलेलं सरकार असून, हे सरकार शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय कसं देईल, असा सवाल करुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोदी, फडणवीस हे कसाई असल्याची जोरदार टीका केली.

काँग्रेस पक्षातर्फे आज गडचिरोली येथे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्या नेतृत्वात शेतकरी न्याय यात्रा काढण्यात आली, त्यावेळी सभेला संबोधित करताना ते बोलत होते. काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते आ.विजय वडेट्टीवार, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खासदार डॉ.नामदेव किरसान, खा.प्रतिभा धानोरकर, आ.रामदास मसराम,आ.अभिजीत वंजारी, पक्ष निरीक्षक सचिन नाईक, माजी मंत्री अनिस अहमद, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, प्रदेश सचिव पंकज गुड्डेवार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार, उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, माजी नगराध्यक्ष अॅड.राम मेश्राम, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष अॅड.कविता मोहरकर, प्रदेश सचिव रवींद्र दरेकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश इटनकर, विश्वजित कोवासे, सतीश वारजूकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणाले, मोदी आणि फडणवीस हे कसाई असून, ते शेतकरी आणि गोरगरीब नागरिकांच्या मानेवर सुरा फिरवत आहेत. मोदींनी आश्वासन देऊनही नागरिकांच्या खात्यात १५ लाख रुपये दिले नाही. दारुचे भाव वाढवून पैसा उभारायचा, नवऱ्याला दारु पाजायची आणि पत्नीला लाडकी बहीण म्हणून पैसे द्यायचे, असा गलिच्छ प्रकार सरकार करीत असल्याची टीका सपकाळ यांनी केली. मोदींच्या काळात हम करें सो कायदा, असे चित्र असून, विरोधात बोलणाऱ्यांना कारागृहात डांबले जात आहे. मोदी-फडणवीसांची जोडी सत्ताभोगी असून त्यांनी देशातील लोकशाही संपुष्टात आणली, असा प्रहार सपकाळ यांनी केला.

विधान सभेतील गटनेते आ.विजय वडेट्टीवार यांनीही केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. कर्मचाऱ्यांचे पगार अदा करण्यासाठी सरकारवर ओव्हरड्रॉफ्ट काढायची पाळी आली. डॉ.मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी ७० हजार कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. मात्र, भाजप सरकारने शेतकऱ्यांऐवजी उद्योगपतींचे १९ लाख कोटी रुपये माफ केले, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

याप्रसंगी अ.भा.काँग्रेस कमिटीचे सचिव कुणाल चौधरी, खा.डॉ.नामदेव किरसान, खा.प्रतिभा धानोरकर, जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांचीही भाषणे झाली. सभेचे संचालन शहराध्यक्ष सतीश विधाते, तर आभारप्रदर्शन अॅड.कविता मोहरकर यांनी केले. सभेनंतर अभिनव लॉन येथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत न्याय यात्रा काढण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT