Gadchiroli Zilla Parishad Morcha
गडचिरोली: कोरोना महामारीच्या काळात सलग २४ महिने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सेवा बजावूनही जाहीर करण्यात आलेला कोरोना भत्ता अद्याप मिळालेला नाही. तसेच इतर प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ हजारो अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर्स यांनी सोमवारी (दि.१३) गडचिरोली जिल्हा परिषद कार्यालयावर विराट मोर्चा काढून जोरदार निदर्शने केली.
प्रा. रमेशचंद्र दहिवडे, अरुण भेलके, किशोर जामदार, कॉ. अरुण लाटकर, छाया कागदेलवार, विठाबाई भट्ट आणि सुनंदा बावणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. आंदोलकांनी शासनाने कोरोना काळात मोबदल्याचे आश्वासन देऊन काम करून घेतले, मात्र पाच वर्षे उलटूनही तो भत्ता न दिल्याचा आरोप केला.
प्रास्ताविकात अमोल मारकवार यांनी शासनाच्या आश्वासनांची आठवण करून देत, अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युइटी लागू करण्याचे लेखी आश्वासन तीन वर्षांपूर्वी देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याची खंत व्यक्त केली.
किशोर जामदार यांनी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्सचे अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचे सांगितले. गेल्या चार महिन्यांपासून केंद्र शासनाचे मानधन मिळाले नसल्याचा आरोप त्यांनी केला. प्रलंबित प्रश्न सोडवण्याऐवजी नवीन समस्या निर्माण केल्या जात असल्याची टीकाही त्यांनी केली.
यानंतर प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. यामध्ये थकीत कोरोना भत्ता तात्काळ अदा करणे, पेन्शन व ग्रॅच्युइटी लागू करणे, मोबाईलद्वारे केलेल्या कामाचा प्रोत्साहन भत्ता देणे, योजनेबाहेरील कामे अंगणवाडी सेविका व मदतनीसांकडून करून घेऊ नयेत तसेच थकीत टीए-डीए त्वरित अदा करावा, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनंदा बावणे यांनी केले. मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी गुलशन शेख, राजश्री खोब्रागडे, माया शेडमाके, ललिता केदार, उज्वला उंदीरवाडे, सुमन तोकलवार, रंजना चौकुंडे, भागीरथा दूधबावरे, रजनी चलकलवार, सिंधू मडावी, भारती रामटेके, विठाबाई भट्ट, सरिता आत्राम, छाया कागदेलवार, विश्रांती डोनाळकर आणि कौशल्या गौरकार यांनी विशेष परिश्रम घेतले.