चंद्रपूर : जिल्ह्यातील धानोरा गावाजवळ वर्धा नदीत बुडालेल्या तिघांचे मृतदेह अखेर आज (दि.२९) सकाळी शोधमोहीमेदरम्यान सापडले. काल अंधारामुळे थांबविण्यात आलेली शोधमोहीम आज पुन्हा सुरू करण्यात आली होती.
धानोरा गाव परिसरात काल घडलेल्या हृदयद्रावक घटनेत राजू कोडापे (वय 40), त्यांची मुलगी अर्पिता कोडापे (वय 12) आणि भाची प्रियांका मडावी (वय 14) हे वर्धा नदीत बुडाले होते. कपडे धुण्यासाठी नदीकाठी गेलेल्या या तिघांचा पाण्याचा अंदाज न आल्याने खोल पाण्यात जाऊन मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती.
घटनेनंतर घुग्घुस पोलिसांसह स्थानिक बचाव पथकाने काल संध्याकाळपर्यंत शोधमोहीम राबवली होती. मात्र अंधार वाढल्यामुळे आणि नदीतील परिस्थिती धोकादायक झाल्याने शोधकार्य थांबविण्यात आले होते.आज सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाच्या मदतीने नदीत सखोल शोध घेतल्यानंतर तिघांचेही मृतदेह सापडले.
घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे धानोरा गावात शोककळा पसरली असून परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, प्रशासनाने नदीकाठी जाताना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे.