चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार दोन दिवसापासून रिपरिप पडणाऱ्या पावसाने शनिवारी पहाटेपासून जिल्ह्यातील धानपट्याला चांगलेच झोडपून काढले. अवकाळी पावसामुळे नागभिड, ब्रम्हपुरी, चिमूर, सिंदेवाही सावली, गोंडपिपरी तालुक्यातील उन्हाळी धानाला फटका बसला आहे.
सावली तालुक्यातील मक्का पीक, गोंडपिपरी तालुक्यातील भाजीपाला, कोरपना तालुक्यातील भूईमुग, मूग पीक धोक्यात आली आहेत. काही भागात धानाला या पाावसाचा फायदा झाला असला तरी अवकाळीमुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. रविवारी पुन्हा येलो अलर्ट असल्याने वादळीवाऱ्यासह अवकाळीची अवकृपा झाली तर शेतकऱ्यांना मोठ्या वित्तहाणीला सामोरे जावे लागणार आहे.
हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात १४ एप्रिल पर्यंत एक दिवस ऑरेंज तर चार दिवस येलो अलर्टचा इशारा दिला होता. मागील तीन दिवसांपूर्वी ४२ अंशावरील तापमानात घट येऊन ढगाळ वातावरणात पावसाची रिपरिप सुरू आहे. गुरूवारी व शुक्रवारी जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पाऊस कमी अधिक प्रमाणात कोसळला. काल शुक्रवारी ऑरेंज अलर्टचा इशारा असताना पावसाची रिपरिप सुरू होती. शनिवारी रात्रीपासून ढगाळ वातावरणात सुरू असलेली पाावसाची रिपरिप वाढत गेली. आज शनिवारी पहाटे विजांच्या कडकडाटांसह अवकाळी जोरदार पाऊस कोसळला.
चंद्रपूर जिल्ह्यात सर्वात जास्त नागभिड, ब्रम्हपुरी, चिमूर, सिंदेवाही सावली, गोंडपिपरी तालुक्यात उन्हाळी धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. सावली तालुक्यात नदीकाठावरील गावात सुमारे दोनशे हेक्टरवर मक्कापिक तर उन्हाळी धानाची लागवड करण्यात आली आहे. गोंडपिपरी तालुक्यातही नदीकाठावरील गावातील शेतात भाजीपाला व उन्हाळी धानपिक आहे. कोरपना तालुक्यातील अनेक गावात भूईमुग तसेच मूगाची लागवड करण्यात आली आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात अवकाळीच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे चढलेला तापमानाचा पारा आता खाली येऊन थंडीची चाहून लागली आहे. शुक्रवारी रात्रीपासून रिपरिप पाऊस सुरू होता. आज पहाटे विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस कोसळला. धानपट्यातील तालुक्यात अवकाळीचा जोर जास्त दिसून आला. त्यामुळे धानपिकाला मोठा फटका बसल्याचे सांगितले जात आहे.
जिल्ह्यात रब्बीमध्ये भाजीपाला लागवड करण्यात आली आहे. या पावसाचा भाजीपाला बागांना फटका बसला आहे. वातावरणात गारवा निर्माण होऊनही शेतकरी मशागतीची कामे करीत आहेत. मात्र वातावरण असच राहिले तर धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या वित्तहाणीला समोरे जावे लागण्याचा धोका कायम आहे. उन्हाळी धानपिक आता शेवटच्या टप्यात आहे. कुठे धान निसवत आहे. तर काही ठिकाणी धान निसवले आहे. त्या पिकांनाही अवकाळीचा फटका बसत आहे. हवामान खात्याने उद्या पुन्हा येलो अलर्टचा इशारा दिला आहे. वादळीवाऱ्यासह आवकाळी कोसळत असल्याने उन्हाळी धानपिक धोक्यात आहे. सध्या तरी गारपीट कुठेही झालेली नाही, वादळही मोठ्या प्रमाणात आलेला नाही. परंतु हवामान खात्याने ताशी ३५ ते ४० किमी वाऱ्याचा वेग वर्तविल्याने धानपिकाला त्याचा फटका बसू शकतो.
हेही वाचा :