Pahalgam Terror Attack
चंद्रपूर : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत. अशा संकटात चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबांतील सात सदस्य देखील पहलगाम येथे अडकले असून, त्यांना चंद्रपूरला परत आणण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. ते काश्मीर प्रशासनाच्या संपर्कात आहेत.
दरवर्षी लाखो पर्यटक काश्मीरात पर्यटनासाठी जात असतात. यंदाही काश्मीर खोऱ्यात पर्यटकांची गर्दी असताना पहलगाम येथे दहशतवादी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये 30 पर्यटक मारले गेले. अनेक पर्यटक तिथे अडकले आहेत. यामध्ये चंद्रपूर शहरातील तीन कुटुंबांतील सात सदस्य अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी तात्काळ व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित कुटुंबांशी संपर्क साधून त्यांच्या सुरक्षिततेची चौकशी केली. यावेळी आम्ही हल्ल्याच्या ठिकाणाजवळच थांबलेलो होतो. आम्हाला चंद्रपूरला परत यायचे आहे, मात्र सध्याचे वातावरण पाहता ते शक्य नाही. आम्ही घाबरलो आहोत, असे त्या कुटुंबातील सदस्यांनी आमदार जोरगेवार यांना सांगितले. अंकीत नगराळे, शिल्पा नळे, स्पर्श नळे, प्रितेश नळे, अजय गाडीवान, तेजस्विनी गाडीवान, वर्षा गाडीवान असे या कुटुंबियांची नावे असून ते नागीनाबग येथील रहिवासी आहेत.
ही बाब गांभीर्याने घेत आमदार जोरगेवार यांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. त्यांनी मदत व पुनर्वसन विभागाचे संचालक सतीशकुमार खडके आणि तसेच जम्मू-काश्मीर येथील प्रशासनाशी थेट दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या कुटुंबाच्या सुटकेसाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याची विनंती केली. सदर कुटुंब थांबलेले स्थान आणि त्यांची सर्व माहिती आमदार जोरगेवार यांनी जम्मू-काश्मीर प्रशासनाला दिली. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने संबंधित कुटुंबीयांशी संपर्क साधल्याची माहितीही समोर आली आहे.
आमदार जोरगेवार यांच्या तत्परतेमुळे या कुटुंबांच्या सुरक्षित चंद्रपूरकडे परतीच्या हालचालींना गती मिळाली आहे. ही कुटुंब सुरक्षितपणे घरी परतेपर्यंत मी सातत्याने प्रशासनाशी संपर्कात राहणार असून, त्यांना आवश्यक ती प्रत्येक मदत दिली जाईल. असे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.