चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा : ताडोबा अभयारण्याच्या बफर झोन मध्ये वसलेल्या बोर्डा गावातील मामा तलाव फुटल्याने शेकडो हेक्टरवरील शेतजमीन पाण्याखाली आली आहे. शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. चंद्रपूर तालुक्यातील बोर्डा हे गाव ताडोबा अभयारण्याच्या बफर घेऊन मध्ये आणि अंधारी नदीच्या काठावर वसले आहे. गावाला लागूनच मामा तलाव आहे. या तलावातील पाण्यावर बोर्डा येथील शेतीला सिंचनाची सुविधा आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ताडोबा अभयारण्यातील जंगलातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात तलावात विसर्ग झाल्यामुळे मामा तलावाची पाळ फुटल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे संपूर्ण पाणी बोर्डा येथील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये शिरले आहे. शेकडो हेक्टर वरील धान पीक व कापूस पीकही पाण्याखाली आले आहे. बोर्डा परिसरात काही हेक्टरवर रोवनी झाली आहे. अजून मोठ्या प्रमाणात रोवणी बाकी आहे. काही शेतकऱ्यांचे परे शेतात उभे आहेत. परंतु, तलाव फुटून पाण्याचा विसर्ग शेतामध्ये झाल्यामुळे भात पीक आणि पऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. थोड्याफार शेतात लागवड केलेला कापूस पीक वाहून गेला आहे.
शेतकऱ्यांसमोर सिंचनाची मोठी समस्या निर्माण होणार आहे. रोवणी केल्यानंतर तलावात पाणी नसल्यामुळे पिक घेण्याचे संकट उभे ठाकणार आहे. या घटनेमुळे शेतकरी पुरता हादरला आहे. अनेक वर्षांपासून मामा तलावाच्या दुरुस्तीची मागणी शेतकरी करीत असतानाही त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे तलाव फुटण्याचे प्रमाण वाढले आहे. याच गावाजवळील चिचपल्ली येथीलही तलाव कालच पहाटे साडेचारच्या सुमारास फुटलेला होता. त्यानंतर पाचच्या सुमारास मामा तलाव फुटला आहे. तलावाचे पाणी गावात शिरले नसले तरी बोर्ड येथील संपूर्ण शेती जलमय झाली आहे.
या परिसरात चेक निंबाळा ग्राम पंचायत अंतर्गत पेंढरी गाव आहे. मुसळधार पावसामुळे अंधारी पाणी गावात शिरले आहे. अन्नधान्याची मोठ्याप्रमाणात नुकसान झाली आहे. घरामध्ये पाणी शिरल्याने घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे.