चंद्रपूर : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहजिल्ह्यातच मागील आठ महिन्यांमध्ये कायदा सुव्यवस्था हाताबाहेर गेल्याने महाराष्ट्राचे काय हाल असतील असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सोमवारी (दि.23) पार पडलेल्या काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीला ते चंद्रपूरात आले होते, या प्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते.
नागपूर शहरातील कायदा सुव्यवस्था हात बाहेर गेली असता उपमुख्यमंत्री फडणवीस भाषण करीत महाराष्ट्रभर फिरत आहेत. त्याचे नागपूर आणि राज्याच्या कायदा सुव्यवस्थेवर लक्ष नाही. माहिती अधिकारातून मागितलेल्या माहिती द्वारे 1 जानेवारी ते 31 ऑगस्टपर्यंत नागपुरात 6883 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये 165 खून, 268 महिलांवर बलात्काराच्या घटना घडल्याचे उघड झाले आहेत. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतून गुन्हेगारीची भिषणता लक्षात येते. महिलांवर होणारे अत्याचाराचे प्रकरणे तीनशेच्या पुढे असल्याचे सांगून फडणवीसांवर हल्लाबोल केला.
राज्याच्या गृहमंत्र्याच्या गृह जिल्ह्यातच कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले असतील, तर महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची काय स्थिती असेल हे हे माहिती अधिकारातून मिळालेल्या माहिती वरून दिसून येते. दररोज पाच महिला शोषणाला बळी पडत आहेत. 15 लोकांचा जीव जातो आहे. हे महाराष्ट्राचे विदारक चित्र राज्यातील सत्ताधाऱ्यांनी केल्याचे सांगून कायदा सुव्यवस्था बिघडवून राज्याला सत्ताधिकाऱ्यांनी खड्यात टाकल्याचा आरोप केला. राज्यात सातत्याने वाढत असलेल्या गुन्हेगारीचा माहिती अधिकारातून समोर आलेल्या आकडेवारीवरून वाचत कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा थेट सवाल केला.