Heatwave wreaks havoc in Vidarbha; temperatures cross 44°C in several districts
चंद्रपूर | पुढारी वृत्तसेवा :
विदर्भात 17 एप्रिल रोजी उष्णतेची तीव्र लाट उसळली असून अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. वर्धा आणि अमरावती येथे सर्वाधिक 44.4 अंश तापमानाची नोंद झाली असून हवामान विभागाने 21 एप्रिलपर्यंत उष्ण लहरीचा इशारा दिला आहे.
विदर्भातील उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून आज तापमानाने अक्षरशः विक्रमी झेप घेतली आहे. वर्धा आणि अमरावती येथे 44.4 अंश सेल्सिअस तापमान नोंदवत या दोन्ही जिल्ह्यांनी सर्वाधिक उष्णतेचा उच्चांक गाठला. अकोला येथे 44.1 अंश तापमान नोंदले गेले.
गडचिरोली, वाशीम आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 44.0 अंश तापमानाची नोंद झाली. चंद्रपूर येथे 43.6 अंश, ब्रह्मपुरी येथे 43.0 अंश तापमान होते. यवतमाळमध्ये 42.8 अंश, गोंदिया 42 अंश, भंडारा 42.0 अंश तर बुलढाणा येथे 41.2 अंश तापमान नोंदवण्यात आले.
विशेष म्हणजे, बुलढाणा वगळता विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे गेले असून अर्ध्याहून अधिक जिल्ह्यांनी 44 अंशांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे संपूर्ण विदर्भ ‘हॉट’ झोनमध्ये गेला असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, हवामान खात्याने विदर्भासाठी 21 एप्रिलपर्यंत उष्ण लहरीचा धोका कायम असल्याचा इशारा दिला आहे. अमरावती आणि अकोला जिल्ह्यांना आजपासूनच ‘हीट वेव्ह’च्या धोक्याच्या यादीत ठेवण्यात आले आहे.
याशिवाय, 18 एप्रिल रोजी नागपूर, वर्धा, यवतमाळ आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये उष्ण लहरीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उष्णतेचा तडाखा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
आज विशेषतः पूर्व विदर्भात अचानक तापमानात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शांतता पसरल्याचे दिसून आले. उष्माघाताचा धोका लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.