

आन्वा : भोकरदन तालुक्यासह आन्वा परिसरात गेल्या तीन दिवसांपासून उन्हाचा चटका वाढला असून सूर्याच्या लंबरूप किरणांमुळे तापमानात वाढ होऊन उकाडा असह्य झाला आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. दुपारच्या वेळी ग्रामीण भागातील रस्ते सुनसान होतात. येत्या चार-पाच दिवसांत तापमापकातील पारा आणखी वर जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान उन्हाचा चटका व उकाड्याचा दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील रस्ते दुपारी सुनसान होतात. नागरिक आपली कामे सकाळी किंवा संध्याकाळी करतात. दिवसा बाजारपेठेतही शुकशुकाट असतो. त्यामुळे लहान-मोठ्या व्यवसायांवरही परिणाम झाला आहे.
उन्हामुळे जीवाची लाहीलाही होत असून, नागरिक घराबाहेर पडण्यास तयार होत नाहीत. एप्रिलच्या मध्यावरच चाळीशी गाठल्याने मे महिन्यात तापमान किती उच्चांक गाठेल या भीतीनेच नागरिक हैराण झाले आहेत.
सकाळी 9 वाजेपासून दुपारी पाचपर्यंत उन्हाच्या झळया सोसणे कठीण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. हवामान दिलेल्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर उष्णतेची ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे. लग्नसराई असल्याने बाजारपेठेत नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे.
काळजी घ्या
सकाळपासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागतात आणि दुपारी 12 वाजेपर्यंत तापमानाचा पारा चाळीशी ओलांडतो. यामुळे दुपारी 11 ते 5 या वेळेत प्रमुख बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे. उष्ण वाऱ्यांमुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत असून, उष्म्यापासून बचावासाठी शहाळी, ताक आणि शीतपेयांच्या गाड्यांवर गर्दी वाढली आहे.